येरवडा – केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याने शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, काही वर्षांत झालेले वाहतूक व अन्य बदल लक्षात घेऊन पूर्वीच्या आराखड्याऐवजी सुधारित आराखडा तयार केला जात आहे. यासाठी सल्लागारांकडून वाहतूक सर्वेक्षण, माती परिक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चौकामध्ये उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे नियोजन होते. मात्र, काही अंतरावरच आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू असल्याने संबंधित काम सुरू करण्यासाठी महापालिकेस केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे होते.
यासाठी पालिकेने दि. ५ एप्रिल २०२४ ला दिल्लीत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणासमोर दृकश्राव्य सादरीकरणही केले होते. त्यानंतरही एनओसीसाठी संबंधित विभागाकडे महापालिकेचा पाठपुरावा सुरू होता, त्यानुसार केंद्र व राज्य पुरातत्त्व विभागाने एनओसी दिल्याने हे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, जुन्या आराखड्यानुसार काम करण्यास अडचण येत होती.
त्यामुळे नवीन आराखडा तयार करण्यात येत असून सर्वंकष विकास आराखड्यानुसार कामे सुरू आहेत. ही कामे झाल्यानंतर महापालिकेस पर्याय सुचविले जातील. त्यातील योग्य पर्यायाची निवड आणि पुलाच्या कामाची निविदा अशी प्रक्रिया असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“शास्त्रीनगर चौकातील पुलाच्या कामास पुरातत्त्व विभागाकडून परवानगी मिळाली आहे. सद्यःस्थितीमध्ये अनेक बदल झाले आहेत. ते बदल लक्षात घेऊन नवीन आराखड्यानुसार पुलाचे काम केले जाणार आहे. सध्या सल्लागारांकडून डीपीआरनुसार आखणी, वाहतूक सर्वेक्षण, माती परिक्षण अशी कामे सुरू आहेत.” – अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, पुणे महापालिका.
हेही वाचा:
बिहारमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत फडकला पॅलेस्टीनचा ध्वज; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल !