राष्ट्रवादी युवा संवादात पक्ष सोडणार नसल्याची देण्यात आली शपथ
पुणे : विधानसभेच्या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील भावी फळीचे मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांना पुण्यात आज चक्क पक्षाध्यक्ष शरद पवार यांना कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याची शपथ देण्यात आली. त्यामुळे पक्षाच्या गळती रोखण्यासाठी शपथेची मात्रा किती कामी येणार अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. तर सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या नेत्यांनाही ही शपथ दिली तरी त्याचा फायदा होणार का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस “युवा संवाद” कार्यक्रमात सर्व कार्यकत्यांनी खा.डॉ अमोल कोल्हे, पार्थ पवार यांचे उपस्थितीत ही शपथ देण्यात आली.
“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. शरद पवार यांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी आहे. गेली ५५ वर्षे राजकारणात आपला ज्यांनी वेगळा ठसा निर्माण केला, अशा पवरसाहेबांच्या कठीण काळात त्यांना साथ देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्यास मी सदैव तत्पर राहीन, माझ्या शरीरात जो पर्यंत श्वास आहे तो पर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही, अशी शपथ कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आली.