पुणे – गावी परतणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. पुण्याहून भागलपूर आणि गोरखपूरसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेची प्रवासी सेवा अद्यापही नियमित सुरू झाली नाही. त्यामुळे रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मूळगावी परतणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने गाड्यांची संख्या देखील वाढवण्यात येत आहे.
10 एप्रिल रोजी पुण्याहून रात्री 9.15 वाजता गाडी सुटणार असून, ही गाडी सोमवारी भागलपूर येथे पोहोचणार आहे. तर भागलपूर येथून 12 एप्रिल रोजी रात्री गाडी सुटणार असून, बुधवारी पुणे येथे पोहोचणार आहे. ही गाडी लोणावळा, पनवेल ,कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी आदी स्थानकावर थांबणार आहे.
याशिवाय पुणे- गोरखपूर मार्गावर 11 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता गाडी सुटणार असून, मंगळवारी पोहोचणार आहे. तर गोरखपुर येथून 13 एप्रिलरोजी गाडी सुटणार असून, गुरुवारी पुणे येथे पोहोचणार आहे. दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर , मनमाड ,भुसावळ , खंडवा, इटारसी, भोपाळ या स्थानकांवर थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
पुणे-दानापूर-पुणे विशेष रेल्वेला मुदतवाढ
रेल्वे प्रशासनाकडून पुणे-दानापूर-पुणे मार्गावरील विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी 2 मे पर्यंत सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची संख्या वाढत आहे. अनेक गाड्यांचे 100 टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांना मुदतवाढ देण्यात येत आहे.
पुणे – दानापूर द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला 30 एप्रिलपर्यंत आणि दानापूर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 2 मेपर्यंत सोडण्यात येणार आहे. या गाडीने प्रवास करण्यासाठी आरक्षण करणे आवश्यक असून, प्रवाशांनी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.