विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढणार ः महाविद्यालय, अभ्यासक्रम निवडताना अडचणी
प्रवेशाच्या दृष्टीने सर्वसमावेशक समिती गठीत करा ः अधिसभा सदस्य
पुणे – करोनाची स्थिती लक्षात घेता सर्व बोर्डाच्या बारावी परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी, सर्वांनाच प्रवेश मिळेलच असे नाही. त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशाबाबत अनेक अडचणी अथवा प्रश्न निर्माण होणार आहेत. त्या पार्श्वभूूमीवर प्रथम वर्ष प्रवेशाच्या दृष्टीने सर्वसमावेशक समिती गठीत करा, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली.
केंद्र व राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावी परीक्षा रद्द केली. तसेच अंतर्गत मूल्यमापनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण दरवर्षीपेक्षा सुमारे 15 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेशासंबंधी महाविद्यालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बारावी निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय व अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत. अनेक अभ्यासक्रमांना मोठी मागणी असतानादेखील विद्यार्थी तो अभ्यासक्रम व महाविद्यालय निवडू शकणार नाही, याकडे अधिसभा सदस्यांनी लक्ष वेधले आहे.
“यंदा बीए, बीकॉम, बीएसस्सी सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे नियोजन राज्य सरकारकडून सुरू आहे. सर्व विद्यार्थी सीईटी देतील. सर्वांना शिक्षण मिळण्याचा हक्क असल्याने, त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.
त्यानुसार शैक्षणिक संस्थांना कार्यवाही करावी लागणार आहे. मात्र, प्रवेश क्षमता कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त असे प्रमाण निर्माण झाल्यास शिक्षण संस्थांसमोर निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा,’ अशी अपेक्षा अधिसभा सदस्यांनी व्यक्त केली.
समिती लवकर स्थापन व्हावी
यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या पदवी अभ्यासक्रम प्रवेशाच्या दृष्टीने विद्यापीठस्तरावर तातडीने सर्वसमावेशक समिती स्थापन करावी, अशी मागणी अधिसभा सदस्य प्रा. शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, दादाभाऊ शिनलकर, संतोष ढोरे व शशिकांत तिकोटे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे कुलगुरुंकडे केली. या समितीत संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य आणि विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश असावा. या समितीच्या माध्यमातून प्रवेशाचे कामकाज सुरळीत पार पाडतील, असा विश्वास अधिसभा सदस्यांनी व्यक्त केला आहे.