पुणे – मार्केटयार्डात 2018-19 या वर्षात शेतमालाच्या पट्टीचे आडत्यांनी शेतकऱ्यांचे थकविलेले 1 कोटी 2 लाख 30 हजार 934 रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या विवाद समितीने (वांधा कमिटी) वसूल करून दिले. स्वतःच्या कष्टाचे थकीत पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुलटेकडी मार्केटयार्डात काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे शेतमालाच्या पट्टीचे पैसे थकविल्याच्या घटना घडतात. मागील वर्षी शेतकऱ्यांनी बाजार समिती विवाद कमिटीकडे तक्रार केलेल्या अर्जांची संख्या 65 होती. तर, 2018-19 या वर्षात 125 नव्याने तक्रार अर्ज आले होते. यात बाजार समितीने लक्ष घालून विवाद समितीकडे आलेल्या एकूण 190 प्रकरणांपैकी 78 प्रकरणे निकाली काढून शेतकरी आणि मध्यस्थींना आडत्यांकडील थकीत शेतमाल विक्रीचे 1 कोटी 2 लाख 30 हजार 934 रुपये इतकी रक्कम परत मिळवून दिली. विवाद समितीचे अध्यक्ष, समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्यासमोर या अर्जांवर सुनावण्या झाल्या.
द्राक्ष हंगामात मार्केटयार्डात द्राक्षांची विक्री केली. सुरुवातीला आडत्यांनी पट्ट्या व्यवस्थित दिल्या. शेवटच्या टप्प्यात आडत्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे बाजार समितीत तक्रार केली. त्यानंतर समितीने पैसे मिळवून दिले.
– सुरेश रूपनर, शेतकरी, तासगाव, सांगली