लॉकडाऊनच्या “मध्यंतरानंतर’ रविवारपासून नाट्यगृहे रिस्टार्ट
पुणे – सांस्कृतिक राजधानीत बऱ्याच प्रतीक्षेनंतर नाट्यगृहांचा पडदा उघडला असून, रविवारी नाटकांसाठी प्रसिद्ध असणारे बालगंधर्व रंगमंदिर रविवारी गजबजले आणि प्रेक्षकांनी “लॉकडाउन’च्या मध्यंतरानंतर पुन्हा नाटकाचे वातावरण अनुभवले.
करोनामुळे मार्चपासून नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे दररोज अनेक नाटकांचे प्रयोग होणाऱ्या पुण्यात एकही प्रयोग झाला नाही. दरम्यान, आता सांस्कृतिक क्षेत्र “रिस्टार्ट’ झाले आहे. रविवारी “एका लग्नाची गोष्ट’ या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोग शुभारंभ बालगंधर्व येथे झाला.
यावेळी अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री कविता लाड यांनी पहिल्या काही प्रेक्षकांना तिकिटे दिली. तर रसिक आणि “संवाद’च्या वतीने दामले आणि लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील महाजन, समीर हंपी, प्रवीण बर्वे आदी उपस्थित होते.