पुणे : पुणे शहरासाठी पाण्याचा कोटा मंजूर करताना त्यावेळी लोकसंख्या किती होती आणि आता लोकसंख्या किती याचा विचार केला पाहिजे. आपण किती पाणी उचलतोय, याचा विचार जलसंपदा विभागाने करायला हवा. आम्ही वापरलेले पाणी प्रक्रिया करून सोडतोय. जलसंपदा विभाग त्याचा किती वापर करतेय, हे त्यांनी तपासावे. त्यानंतर सध्याची लोकसंख्येचा विचार करता पाणी कमी पडू नये. पुणे शहराच्या पाण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सूचित केले.
पुणे शहराचा पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढवून देण्यास जलसंपदा विभागाने नकार दिला आहे. त्याबाबत मोहोळ म्हणाले की. आता पुण्याची लोकसंख्या वाढली आहे. आम्ही जेवढे पाणी सोडायला पाहिजे, तेवढे पाणी आम्ही सोडत आहोत. तसेच, सोडलेले पाणी किती उचलतात याचा त्यांनी तपास केला पाहिजे. लोकसंख्या विचारात घेऊनच पाण्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे.
गेल्या आठवड्यात एकूण ३३ विमानतळ संदर्भात बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. २०२९ पर्यंत पुरंदरचे विमानतळ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विमानतळ बांधायचे असेल तर जागा राज्य सरकार देते, त्या अनुषंगाने पुरंदर विमानतळसाठी राज्य सरकार जागा देईल.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच विस्तारीकरण करण्यात येणार आहे. आधी तातडीने भूसंपादन होईल. राज्य सरकार, पुणे पालिका, पिंपरी पालिका आणि जिल्हा प्रशासन यासाठी निधी उपलब्ध करून देईल, असेही मोहोळ म्हणाले.
पालिकेत सामूहिक नेतृत्व…
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पुण्याचा कारभारी कोण असणार असे विचारले असता मोहोळ म्हणाले की, भाजपामध्ये कोणी एक व्यक्ती नेतृत्व करीत नाही. त्यामुळे पुण्यात सामूहिक नेतृत्व केले जाते. अगदी राज्यात अन् देशात ही तसेच आहे, असे सांगत आगामी महापालिका निवडणुकीत सामूहिक नेतृत्व असेल, असे संकेत मोहोळ यांनी दिले.