पुणे – मोफत लसीकरणाच्या पंतप्रधान मोदी यांच्या आश्वासनाचे काय झाले? याचे उत्तर आपण द्यावे तसेच केंद्र सरकारलाही आपल्या आश्वासनाची आठवण करून द्यावी आणि मोफत लस त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करत केंद्राच्या लसीकरण मोहिमेचा समाचार घेत भाजपवर बोचरी टीका केली.
केंद्र सरकारने राष्ट्रीय लसीकरण धोरणानुसार सर्वांच्या मोफत लसीकरणाचा विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आपणही दि. 28 एप्रिल रोजी एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला मोफत लस टोचली जाईल, त्याचा भार राज्य सरकारांवर पडणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी “मन की बात’ कार्यक्रमात दिल्याचे सांगितले.
प्रत्यक्षात मात्र केंद्र, राज्य सरकारांमध्ये लसीच्या दरावरून घोळ सुरू आहे. दरम्यान, लसीकरण मोहीमेचे महत्त्व जाणून लस विकत घेण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे. परंतु, प्रश्न येतो की, मोफत लसीकरणाच्या पंतप्रधान मोदी यांच्या आश्वासनाचे काय झाले? याचे उत्तर आपण द्यावे तसेच केंद्र सरकारलाही आपल्या आश्वासनाची आठवण करून द्यावी, अशी मागणी केली आहे.