पुणे – करोना संसर्गामुळे यंदाही “शाळा बंद, शिक्षण सुरु’ अशी परिस्थिती आहे. मात्र, ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येईल असे नाही. त्यामुळे ऑनलाइनसह प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, त्याबाबत बुधवारी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये दहा कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही, त्यांचासाठी कार्यपुस्तिका तयार करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष व प्राथमिक शिक्षण विभागाचे सभापती रणजित शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.16) शिक्षण विभागाची बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. करोना संसर्गामुळे मागील पूर्ण शैक्षणिक वर्ष मुलांचे ऑनलाइन शिक्षणामध्ये गेले. तर यावर्षीही करोनाचे संकट कायम असून, करोनाची तिसरी लाटही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मात्र, मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी जिल्हा परिषदेकडून यावर्षीही ऑनलाइन शिक्षणपद्धती सुरू ठेवली आहे. करोनामुळे प्रत्यक्ष वर्ग बंद असल्यामुळे ऑनलाइन आणि दुरदर्शनवरून शिक्षण दिले जात आहे. परंतु, जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेकांकडे ऍन्डॉईड मोबाइल नाहीत. दुर्गम भागात नेटवर्कचा अडचणी आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन या पद्धतीने शिक्षण देण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये 10 कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिका तयार केली जात आहे. त्यामाध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.
======================