पुणे – उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुण्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली. शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव जाणवत आहे. मंगळवारी (दि.9) जळगाव येथे सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तर, राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 7 ते 12 अंश सेल्सिअसदरम्यान होते. पुण्यात 8.6 अंश सेल्सिअस किमान, तर 31.6 अंश सेल्सिअस कमाल तापमाची नोंद घेण्यात आली.
देशाच्या उत्तरेकडील भागातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण करणारा मध्य प्रदेश ते विदर्भदरम्यान असलेला कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे राज्यात वाऱ्यांच्या प्रवाहासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने थंड हवेच्या परिणामामुळे वातावरणात बदल होत आहे आणि तापमानातही सातत्याने घटत आहे.
पुढील दोन दिवस तापमानाची ही स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर थंडी कमी होईल अशी शक्यता विभागाने वर्तवली आहे.