पुणे –“ई संजीवनी ऍप’च्या माध्यमातून टेलिमेडीसीन सेवा प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याची राज्य सरकारची योजना आहे. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी एक स्वतंत्र अधिकारी असणार आहे. यामुळे आता अतिदुर्गम भागातही तज्ज्ञ डॉक्टरांची आणि औषधोपचाराची सेवा मिळू शकणार आहे.
दुर्गम भाग, खेडेगावात शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने टेलिमेडीसीनसाठी “ई संजीवनी’ सेवा करोना प्रादुर्भावाच्या काळात सुरू केली होती. ग्रामीण भागात सामान्य आणि विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी हे सुरू करण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने याच्या उद्घाटनावेळीच स्पष्ट केले होते.
आरोग्य केंद्रांमध्ये नियुक्त असलेल्या डॉक्टर्सच्या माध्यमातून तज्ज्ञांशी व्हर्च्युअलच्या माध्यमातून सल्लामसलत करून ई प्रिस्क्रिप्शनद्वारा औषधे दिली जाणार आहेत. सध्या, ही सेवा देशातील सुमारे 50 हजार आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर सुरू आहे.
आत्तापर्यंत या सेवा राज्यात प्रादेशिक स्तरावर, महाराष्ट्रातील पुणे, भंडारा, अकोला, नांदेड आणि नागपूर या पाच मंडळांमध्ये पुरवल्या जात आहेत. पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचा समावेश असलेल्या पुणे परिमंडळात, प्रत्येक रुग्णाला सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाने आता जिल्हा स्तरावर ही सेवा विस्तारित करण्याची योजना आखली आहे. सध्या, प्रत्येक मंडळातील एक वैद्यकीय अधिकारी रुग्णांना सेवा देण्यासाठी उपस्थित राहतो. आता प्रत्येक जिल्ह्यातील एका वैद्यकीय अधिकारी स्तरापर्यंत ही सेवा वाढवण्यात येणार आहे.
हे मॉडेल खूप यशस्वी झाले आहे आणि याआधी केवळ सामान्य चिकित्सक किंवा बीएएमएस डॉक्टरच ग्रामीण आरोग्यसेवेच्या गरजा भागवू शकत होते. परंतु, आता या सुविधेमुळे दुर्गम खेड्यात असलेली व्यक्ती मोठ्या शहरात बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलू शकते. या सेवेमध्ये डॉक्टर ते डॉक्टर कनेक्शन देखील उपलब्ध आहे. जेणेकरून तज्ज्ञ डॉक्टरांनी “पॅरामेडिक’ किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा ऍपद्वारे समन्वय साधू शकतात.
– डॉ. संजय देशमुख, सहाय्यक संचालक,
राज्य आरोग्य सेवा पुणे विभाग