सोसायट्यांतील रहिवाशांचे आर्थिक गणित कोलमडले
पुणे – शहरात पाणी टॅंकरची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 10 हजारांनी वाढली आहे. महापालिकेकडून केला जाणारा पाणी पुरवठा अपुरा व विस्कळीत असल्याने टॅंकरची मागणी झपाट्याने वाढली आहे. विशेषत: हद्दीजवळील भागांत टॅंकरसाठी पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे सोसायट्या तसेच नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
महापालिकेकडून शहरात एप्रिल 2022 मध्ये तब्बल 30 हजार 580 टॅंकर फेऱ्या झालेल्या आहेत. हाच आकडा एप्रिल-2021- 21 हजार 247, तर एप्रिल 2020 मध्ये-21 हजार 721 होता. पण, यंदा हे प्रमाण 31 हजारांच्या घरात गेले आहे.
प्रामुख्याने पाण्याचा हा तुटवडा शहरातील उपनगरीय भागातील सोसायट्यांमधे जाणवत आहे. महापालिकेने ज्या भागात पाणी कमी येते अथवा पाणी बंद असते अशा भागांसाठी ही टॅंकरची सुविधा दिली जाते. त्यात काही टॅंकर महापालिका मोफत देते, तर काही नागरिकांना महापालिकेचे चलन घेऊन मागविता येतात. खासगी टॅंकर चालक महापालिकेकडून चलन घेऊन या नागरिकांना पाणी पुरवितात.
महापालिकेकडून हे दहा हजार लिटर पाण्याचे टॅंकर ठेकेदारांना साडेसहाशे रुपयांना दिले जातात. मात्र, पुढे अंतर तसेच सोसायट्यांच्या गैरसोयीचा गैरफायदा घेत हे टॅंकर सोसायट्यांना दीड ते दोन हजार रुपयांना विकले जातात. त्यामुळे अडीचशे घरांची सोसायटी असल्यास पाण्याचे किमान 10 ते 15 टॅंकर घ्यावे लागत आहेत.
करही भरायचा
एका बाजूला महापालिका पुरेसे पाणी देत नसल्याने नागरिकांना टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. तर, नागरिकांना मिळकतकरात पाणीपट्टी भरावी लागत आहे. विशेष म्हणजे मिळकतकर थकल्यास त्यावर व्याजही भरावे लागत आहे. पुन्हा पाण्यासाठी टॅंकरलाही पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे किमान ज्या सोसायट्यांना वर्षभर टॅंकर घ्यावे लागत आहेत, त्यांच्याकडून किमान पाणीपट्टीतरी घेऊ नये अशी मागणी होऊ लागली आहे.