पुणे – आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये पुढील फेरीमध्ये अर्जात सुधारणा करण्याची संधी देत प्रवेशप्रक्रिया पूर्ण सक्षमतेने राबवत प्रवेश नाकारणारे शाळांवर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. तसेच आरटीई प्रवेशाच्या संदर्भात पालकांच्या समस्या सोडविणेसाठी “मनविसे’ने व्हॉट्सऍप हेल्पलाइन क्रमांक सुरू केल्याचे “मनविसे’चे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.
आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ न शकलेले, प्रवेश अर्ज करतेवेळी चुका झालेल्या अथवा अंतर चुकले असेल किंवा बोर्ड, माध्यम चुकले असेल अशा सर्व पालकांना अकरावी प्रवेशाच्या धर्तीवर पुढील प्रवेशफेरीपूर्वी त्या अर्जात सुधारणा करण्याची संधी पालकांना उपलब्ध दिले पाहिजे, अशी संघटनेची मागणी आहे.
बहुतांश पालकांकडून त्यांचे गूगल लोकेशन चुकले असून घर ते शाळा अंतर एक किमी पेक्षा जास्त आहे. काही पालकांना पॅन कार्ड मागून तुमचे उत्पन्न जास्त असल्याने प्रवेश नाकारत असल्याचे तक्रारी आहेत. पडताळणी समितीपैकी एखादाच अधिकारी उपस्थित रहात असून, पालकांना विश्वासात घेत जात नसल्याचे दिसून येत आहे. काही शाळां तर आरटीईमध्ये प्रवेश देण्यास टाळाटाळ करत आहे. अशा बहुतांश तक्रारी पालकांना येत आहे. त्यापासून सुटका होण्यासाठी 788-7888-622 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आल्याचे यादव यांनी म्हटले आहे.