पुणे -शहरातील बहुसंख्य शाळांमधील इयत्ता पहिली ते नववी, अकरावी या वर्गांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. मात्र, तरीही शाळांनी अद्याप विद्यार्थ्यांना सुट्ट्या दिलेल्या नाहीत. सुट्ट्या कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थी, पालक यांच्याकडून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
करोनामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता व आरोग्य याला प्राधान्य देत पावणेदोन वर्षे शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू होते. मात्र हे शिक्षणही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच असेल असे नाही. ऑनलाइन शिक्षणही विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटले. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंदही झाला. बऱ्याचशा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत. मात्र करोनाकाळात बुडालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी शाळांनी सुरू केली आहे. याबरोबर विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची ओढ लागावी यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यासही सुरुवात झाली आहे.
दरवर्षी परीक्षा संपल्या की शाळांना सुट्ट्या लागतात. यंदा मात्र तसे होताना आढळून येत नाही. शिक्षण विभागाने 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र याला तीव्र विरोध झाला होता. शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. दरम्यान इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अद्यापही 15 टक्के शुल्क सवलतीची अंमलबजावणी केलेली आढळून येत नाही. शुल्क वसुलीसाठी शाळांनी तगादा कायम ठेवलेला आहे. यासाठी परीक्षा संपल्या तरी शाळा सुरू आहेत.