बसथांब्यांवर प्रवाशांना पीएमपीची यंदा “अभ्यंगस्नान’ सुविधा!
बस थांब्यांच्या निविदांना काही केल्या प्रतिसादच मिळेना
पुणे – पुणेकरांना जागतिक दर्जाच्या बससेवेचे स्वप्न दाखवत पीएमपी प्रशासनाने संपूर्ण उन्हाळा “विस्टाडोम’ (पूर्ण पारदर्शक) बस थांब्यांमध्ये घालवला. आता पीएमपीने पावसाळ्यातही पुणेकरांना “अभ्यंगस्नान’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस निश्चित केला आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पीएमपीने गेल्या वर्षभरापासून 1500 बस थांबे “बीओटी’ तत्वावर उभारण्याच्या निविदा 2 वेळा काढल्या. तसेच प्रत्येक निविदेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही बस थांबे उभारण्यासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नसल्याने पुणेकरांना उन्हाळ्याच्या झळा सोसल्यानंतर आता पावसाच्या धाराही झेलाव्या लागणार आहेत.
निविदांमध्ये जवळपास वर्ष गेले असून करोना नंतर पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू होऊनही सहा महिने होत आले. तरीही, बसथांबे उभारण्यात येत नसल्याने प्रवाशीही तक्रारी करून हतबल झाले आहे. दरम्यान, याबाबत पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
अनेक महिन्यांपासून निविदांचाच खेळ
मागील वर्षी पीएमपीने 1,600 नवे बसथांबे उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पैसे नसल्याने बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर हे थांबे उभारले जाणार होते. त्यासाठीची पहिली निविदा जून 2021 मध्ये काढण्यात आली. त्याला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे या निविदेला मुदतवाढ दिली. मात्र, कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या कामासाठी कोणी येणार नाही, असा अंदाज बांधत पीएमपीने पुन्हा 6 मे 2022 मध्ये प्रत्येकी 600 बस थांब्यांची एक निविदा काढली. तसेच त्यासाठी 16 जून ही अंतिम तारीख होती. मात्र, यावेळीदेखील प्रतिसाद न आल्याने या निविदेला मुदतवाढ देत 23 जूनपर्यंत पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे एकही कोणीही हे काम करण्यास पुढे न आल्यास मोठी अडचण होणार आहे.
आता झाडाखाली थांबणेही धोक्याचे
महापालिका आणि पीएमपीने शहरभर कोट्यवधींचा खर्च करत स्टेनलेस स्टीलचे बस थांबे उभारले. पण, या बसथांब्यांच्या सांगाड्यांचा एक-एक भाग दररोज गायब होत आहे. अनेक बसथांब्यांना छप्पर आणि आसनही नाहीत. काही ठिकाणी केवळ लोखंडी खांब उरले आहेत. तर काही ठिकाणी सांगाडेही तोडून विकण्यासाठी नेले आहेत. यातील अनेक बसथांबे मोठ्या झाडांखाली होते. त्यामुळे नागरिकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला. मात्र, आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात शहरात झाडे कोसळण्याच्या तसेच झाडांवर वीज कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. त्यामुळे आता प्रवाशांना झाडाखाली थांबणेही जीवावर बेतणारे ठरणार आहे.
1,600 बस थांब्याचे छत गायब
शहरात पीएमपीचे एकूण 4 हजारहून अधिक बस थांबे आहेत. त्यातील जवळपास 1600 बसथांब्यांची दुरावस्था झालेली आहे. काही ठिकाणी थांबा नसून केवळ पाट्या राहिल्या आहेत. काही बसथांबे चोरीलाही गेलेले आहेत. मागील काही वर्षांत पीएमपीने आमदार, खासदार तसेच नगरसेवकांच्या निधीतून नव्याने लावलेल्या थांब्यांचीही दुरवस्था झालेली आहे.