* राज्य शासनाच्या निर्णयावर शिक्षणसंस्था, तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे
थेट डिप्लोमा द्वितीय वर्ष प्रवेशासाठी गणित विषय गरजेचा असल्याचे तज्ज्ञांचे मत
शिक्षण संस्थांकडून निर्णयाचे स्वागत
पुणे – यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) प्रवेशासाठी गणित विषयाची अट वगळली आहे. डिप्लोमासाठी गणित हा विषय आवश्यक आहे. गणिताशिवाय डिप्लोमा पूर्ण केलेला विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये टिकतील या विषयी साशंकता व्यक्त होत आहे. याउलट शिक्षणसंस्थांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्याचा निर्णय घेतला. आता निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमांत प्रवेश देण्याची घोषणा त्यांनी केली होती.
विद्यार्थी बारावी उत्तीर्णनंतर थेट द्वितीय वर्ष डिप्लोमाला प्रवेश घेतात. यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्यात बदल केला आहे. याचाच अर्थ आता गणित विषय नसला तरी त्यास प्रवेश घेता येणार आहे.
डिप्लोमा अभ्यासक्रमात गणित हा विषय महत्त्वाचा आहे. गणित हा डिप्लोमाचा पाया आहे. त्याशिवाय विद्यार्थी डिप्लोमा पूर्ण करत असतील, तर ही बाब शैक्षणिकदृष्ट्या चिंताजनक आहे. गणित नसतानाही विद्यार्थी डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यास त्यांना नोकरीच्या ठिकाणी अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागेल. ही मुले इंडस्ट्रीच्या क्षेत्रात यशस्वी होतील, याबाबत शंका आहे. त्यामुळे गणित हा विषय डिप्लोमा प्रवेशासाठी असला पाहिजे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी गणित विषयाची अट वगळली, हा निर्णय योग्य म्हटला पाहिजे. गणित हा विषय असलाच पाहिजे. परंतु एखादा ब्रिज कोर्सद्वारे विद्यार्थ्यांची गणिताची तयारी करून घेता येणे शक्य आहे. तसेच डिप्लोमाच्या काही शाखांमध्ये गणित विषयाचा थोडाच भाग आहे. अशा शाखांची निवड विद्यार्थ्यांना करता येऊ शकतो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा बदल स्वागतार्ह आहे.
– प्रा. रामदास झोळ, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया
बारावीला पुढीलपैकी कोणतेही तीन विषय
भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल विषय, ऍग्रिकल्चर, अभियांत्रिकी ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष डिप्लोमास प्रवेश मिळणार आहे.
प्रवेशाची संख्या वाढण्यासाठी निर्णय?
थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमतेच्या तुलनेत विद्यार्थी येत नसल्याचे शिक्षणसंस्थांपुढे मोठा प्रश्न उभा आहे. शैक्षणिक संस्थांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय राज्य सरकारने घेतला गेला आहे, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळातून होत आहे. गणित विषयाची अट वगळण्याने आता प्रवेशाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयावर शिक्षण क्षेत्रात मतभिन्नता आहे.