नेमके कुठे राहतात, ते कुठे फिरतात, कधी बाहेर पडतात यांची माहिती कळणार
पुणे – शेतात बिबट्या नेमके कुठे राहतात, ते कुठे फिरतात, कधी बाहेर पडतात, अन्नाच्या शोधात कुठे जातात याची प्रथमच माहिती वन खात्याच्या हातात येणार आहे. कारण, त्यांना “कॉलर’ बसविण्यात येणार आहे. यासाठी सरकारतर्फे मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रत्यक्षात “कॉलर’च्या माध्यमातून बिबट्याच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यात येणार आहे.
वनविभाग आणि वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने पुण्यातील बिबट्यांचा अभ्यास केला जात आहे. चार वर्षांच्या या अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील बिबट्यांचे हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहेत. या अभ्यासानुसार, जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांतील 40 गावे ही बिबट्याचे हॉटस्पॉट बनवण्यात आले आहेत.
अभ्यासाच्या पुढील टप्प्यात बिबट्याच्या जीवनशैली, त्यांचा भ्रमणमार्ग आणि लोकसंख्या यांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी बिबट्याला कॉलर बसविण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाली असून, लवकरच या अभ्यासाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे, अशी माहिती जुन्नर वन परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक जयराम गौडा यांनी दिली.
गौडा म्हणाले, “”या अभ्यासाच्या पुढील टप्प्यात आम्ही बिबट्याची गणना करणार आहोत. यासाठी बिबट्यांचा सर्वाधिक वावर असलेल्या प्रदेशाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच याठिकाणी कॅमेरा ट्रॅपही बवसण्यात आले आहेत. दर दोन किलोमीटर अंतरावर बसवलेल्या कॅमेरा ट्रॅपद्वारे बिबट्याच्या हालचाली टिपण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्यातून बिबट्याबाबत अधिक सविस्तर माहिती मिळाल्यानंतर या भागातील मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या पाहिजे, याचे धोरण आखता येणार आहे.”
बिबट्याचा विस्तार वाढतोय
जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांनंतर आता इतर ठिकाणीदेखील बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून येत आहे. वनविभागाच्या निरीक्षणानुसार शहराच्या पूर्वेकडे दौंड, बारामती, इंदापूरला तर दक्षिणेकडे सातारा जिल्ह्याकडे बिबट्याचा विस्तार वाढत आहे. आगामी काळात या भागांमध्ये अधिक बिबटे दिसण्याची शक्यता विभागाने वर्तविली.
पीक पद्धतीत बदलाची गरज
ऊसशेती हा गेल्या काही काळात बिबट्याचा अधिवास बनला आहे. जिल्ह्यातील ऊस शेतीचे प्रमाण अलीकडील काळात तीन पटींने वाढले असल्याने बिबट्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून बिबट्यांची संख्या आणि विस्तार दोन्ही वाढत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पीक पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.