पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला. आता सर्व विद्यार्थ्यांना येत्या मंगळवारी (दि.11) दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे, असे राज्य शिक्षण मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
राज्य मंडळातर्फे ऑनलाइन निकाल जाहीर होऊन दहा दिवसांचा अवधी उलटून गेला तरी विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचे वाटप झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून कनिष्ठ महाविद्यालयाकडे गुणपत्रिका कधी मिळणार याची विचारणा केली जात होती. अखेर याबाबत मंडळाने परिपत्रक प्रसिद्ध केले. येत्या मंगळवारी गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.