फुरसुंगी -पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावांपैकी उरूळी देवाची आणि फुरसुंगी गाव पालिकेतून वगळण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी दोन्ही गावांतील ग्रामस्थांचे मतदान घ्यावे, पालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णयामुळे या गावांची अधोगती होऊन बकालपणा व सुनियोजित विकास रखडणार आहे, त्यामुळे शासनाने या गावांचा वाढीव कर (टॅक्स) कमी करून ही गावे पालिकेतच ठेवावीत अन्यथा न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावर उतरुन तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
फुरसुंगी आणि उरूळीदेवाची या गावांतील बहुसंख्य ग्रामस्थांची मागणी केवळ मिळकत कराचे दर कमी करून गावे पालिकेतच ठेवावी अशी आहे. याबाबत माजी सरपंच उल्हास शेवाळे, महेंद्र शेवाळे, विकास भाडळे, राजेंद्र बाजारे, अनिरुद्ध पाचपुते, गणेश शेवाळे, सुशांत शेवाळे, विशाल भाडळे,जितेंद्र तिवारी, निखिल बाजारे, शैलेंद्र बाजारे, धनंजय चव्हाण, सागर टिळेकर यांनी पत्रकार परिषद घेत फुरसुंगी आणि ऊरूळीदेवाची ही गावे पालिकेतून वगळण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला.
गावे महापालिकेतच असावीत, फक्त पालिकेने मिळकत कर कमी करावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही न्यायालयातही गेलो आहोत. गावे वगळून प्रश्न सुटणार नाही. याकडे आम्ही शासन आणि महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने गावे वगळण्याचा ठराव करू नये, लोकनियुक्त नगरसेवकांची मान्यता नसताना महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेऊ नये, अशी मागणी महापालिका आयुक्त आणि प्रशासकांकडे माजी सरपंच उल्हास शेवाळे यांनी केली आहे. यानंतरही निर्णय घेतला गेल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
गावे महापालिकेत राहिल्यास…
वाढीव टॅक्सचा मुद्दा निकाली निघू शकतो
पालिकेकडून मोठा विकासनिधी मिळू शकतो
नवीन विकास आराखड्यानुसार सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकतात
मोठे प्रकल्प येऊन दोन्ही गावांचा सुनियोजित विकास