महावितरणने मीटरच न दिल्याने प्रकल्प गुंडाळलेला
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची अडचण
पुणे – जिल्हा परिषदेसह इतर पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रावर सौरऊर्जा प्रकल्पासाठीचे सौर पॅनल बसवण्याचे काम मार्च अखेर झाले. मात्र, त्यासाठीची आवश्यक असणारी महावितरणकडून बसवण्यात येणारे मीटर न बसवल्यामुळे कुठलाच प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. जिल्हा परिषदेकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, मात्र मीटर अभावी हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही.
सौरऊर्जा प्रकल्पातून वीजबिलासाठीच्या रकमेत 25 टक्के कपात होणार आहे. 50 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी 24 ठिकाणी मीटर बसवण्यात आले आहेत. या मीटरमुळे एमएससीबीकडून किती विद्यूत पुरवठा घेतला आणि सौरऊर्जा प्रकल्पातून किती, यासाठी या नेट मीटरचा वापर होतो. त्यामुळे पंचवीस टक्के वीज बचत होऊन प्रत्येक महिन्याला साधारण एक लाखांपर्यंत पैशांची बचत होईल. सध्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाचे वीजबिल साधारण चार ते साडेचार लाख रुपये येते.
ग्रामीण भागात विद्यूत पुरवठा खंडित झाल्यानंतर आरोग्य केंद्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता. तीन किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला तरी रुग्णांवर उपचारामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासाठी 60 किलोवॅट, सात पंचायत समित्यांमध्ये प्रत्येकी 10 किलोवॅट आणि 50 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 3 किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प आहे. जिल्हा परिषदेला प्रत्येक दिवशी 1 हजार ते 1 हजार 200 युनिट वीज आवश्यक असते, तर सौरऊर्जेमधून 300 युनिटपर्यंत वीज मिळणार आहे.