वालचंदनगर (वार्ताहर) – करोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार कळंब-नातेपुते रस्त्यावरील नीरा नदीवरील कळंबोलीचा पूल (पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
वालचंदनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसेंदिवस करोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे कंटेन्मेंट व बफर झोन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पोलिसांनी वालचंदनगर-नातेपुते मार्गावरील कळंबोली पूल, चिखली बंधारा, कुरवली पूल, जांब बंधारा व तावशी पूल या मार्गावरील जिल्ह्याबाहेरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जो पासशिवाय पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रवेश करेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जे नागरिक कामासाठी पुणे-मुंबई या ठिकाणी कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊन पुन्हा गावी येतात, त्यांनी त्याबाबतची माहिती पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाला द्यावी. तसेच स्वत:हून क्वारंटाइन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.