पुणे – बिबट्याच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणात अटक केलेल्या आठ जणांना 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एस.पाटील यांनी पोलीस कोठडी सुनावली. वारजेतील डुक्करखिंड परिसरात वनविभागाने त्यांना पकडले आहे. बिबट्याची शिकार कोणी व कोठे केली. तसेच, इतर कोणी आरोपी आहेत का, तर त्याच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी सर्वांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.
अनिकेत प्रमोद भोईटे (वय 20), संदीप शंकर लकडे (वय 34, रा. फलटण), धनाजी नारायण काळे (वय 35, रा. औरंगाबाद), आदेश शरदराव इंगोले (वय 47, रा. बारामती), बाळू बापू नामदा (वय 65, रा. कराड), आकाश अण्णासाहेब रायते (वय 27), उदयसिंह शंकरराव सावंत (वय 47, दोघेही, रा. इंदापूर), अमोल रमेश वेदपाठक (वय 34, रा. वेचले, ता.जि.सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भांबुर्डा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार, तिघेजण वारजेत येणार असल्याचे समजल्यानंतर वनविभागाने बनावट ग्राहक म्हणून त्यांच्याशी संपर्क केला. त्यांना संपर्क साधल्यानंतर त्यांनी वारजे परिसरात बोलावले.
त्याचदरम्यान, वनविभागाने याभागात सापळा रचला. आरोपींनी दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणांचे पत्ते दिले. त्यानंतर त्यांना डुक्करखिंड परिसरात बोलविण्यात आले. तेथे गेल्यानंतर त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत बिबट्याचे कातडे दिसून आले. पथकाने छापा टाकत अनिकेत, संदीप व धनाजी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत बिबट्याचा व्यवहार सासवड येथे होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सासवड येथे सापळा रचून इतर आरोपींना बुधवारी अटक केली आहे.