पुणे –देशातून दरवर्षी साधारण दोन ते अडीच लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात होते. त्यापैकी 90 ते 95 टक्के म्हणजेच दीड ते दोन लाख मेट्रिक टन निर्यात एकट्या महाराष्ट्रातून होते. परंतु, यावर्षी रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत केवळ 60 टक्केच निर्यात झाली आहे.
भारताने नुकतेच 400 अब्ज डॉलर निर्यातीचे उदिष्ट साध्य केले आहे. त्यात शेती क्षेत्राचाही मोठा वाटा आहे. भारत रशिया, नेदरलॅंड, जर्मनी, युके, पोलंड आणि स्पेन आदी देशांनाही द्राक्ष निर्यात करतो. विशेषतः युरोपातून द्राक्षांना मोठी मागणी असते. एकूण निर्यातीच्या 70 टक्के निर्यात ही युरोपात होते. परंतु, रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता आहे. त्याचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला आहे. 2021 मध्ये भारताने 106809 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात केले होते आणि त्यातून देशाला 2298 कोटी उत्पन्न मिळाले होते. तर, महाराष्ट्राने 106020 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात केले होते आणि त्यातून देशाला 2233 कोटी उत्पन्न मिळाले होते.
2019- 20
भारत – 193960 मेट्रिक टन
महाराष्ट्र – 190400 मेट्रिक टन
2020-21
भारत – 106809 मेट्रिक टन
महाराष्ट्र – 106020 मेट्रिक टन
2021-2022
भारत – 60700 मेट्रिक टन
महाराष्ट्र – 60638 मेट्रिक टन
यावर्षी द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. परंतु, अवकाळीमुळे बागायतदारांचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मागणी घटल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे आहे.
– रवींद्र निमसे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
रशिया-युक्रेन युद्ध आणि वाहतूक खर्चात वाढ याचा एकंदरीत परीणाम निर्यातीवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिरता असल्याने त्याचाही परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला आहे.
– सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ