पुणे- बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केल्यास प्रवेश रद्द होणार आहे. याबरोबरच पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी कमलाकर रणदिवे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी “आरटीई’ प्रवेशासाठीच्या सूचना जारी केल्या आहेत. “आरटीई’ प्रवेश प्रक्रियेसाठी पुणे जिल्ह्यातील 957 शाळांनी नोंदणी केली असून त्यात 15 हजार 132 प्रवेशाच्या जागा दर्शवल्या आहेत. यासाठी 15 हजार 489 ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. ज्या बालकांनी यापूर्वी “आरटीई’अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास संबंधित बालकांचे पुन्हा अर्ज करता येणार नाहीत. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. पालकांनी प्रवेश अर्ज भरताना आपला स्वत:चा मोबाइल क्रमांक नोंद करावा लागणार आहे. घराचा पत्ता व गुगल बलून अचूक दर्शवावा लागणार आहे. शाळा ते घर हवाई अंतर अचूक नमूद करणे गरजेचे आहे.
काही “एनजीओ’ पालकांचे अर्ज भरून देतात. त्यामध्ये पाल्याच्या निवासाचे स्थान (गुगल लोकशन) जाणीवपूर्वक शाळेच्या जवळ दाखवतात. चुकीचे भरले जातात. याबाबत संस्थाविषयी तक्रारी प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. पडताळणी समितीमार्फत पत्याबाबत अचूक खात्री करावी लागणार आहे. पालकांनी आपली कागदपत्रे परस्पर अन्य व्यक्तीस देऊ नये. प्रवेश मोफत असल्याने पैसे घेऊन कोणी प्रवेश करतो असे सांगत असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. याबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस चौकीमध्ये करून त्याबाबती माहिती जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कळवावी लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला, निवासाचा पुरावा, इतर कागदपत्रे बनावट आढळून आल्यास प्रवेश रद्द होणार आहेत. खोटी माहिती भरल्यास पाल्याचा प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकतो, असेही जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.