पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा विश्वास, दै. “प्रभात’शी साधलेला खास संवाद
– संजय कडू
पुणे – लॉकडाऊननंतर गुन्हेगारांच्या मानसिकतेत झालेला बदल, छोट्या मोठ्या कारणावरून शस्त्रे उगारण्याची निर्माण झालेली वृत्ती, नव्या टोळ्यांची शहरात निर्माण झालेली दहशत अशा पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सूत्रे स्वीकारली. अवघ्या चारच महिन्यांत त्यांनी पुण्याच्या गुन्हेगारीला वेसण घातले.
सुत्रे स्वीकारतानाच तीन महिन्यांत पुण्यातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्याचे दिलेले आश्वासन तर पार पाडलेच. पण, आजवर कोणत्याही अधिकाऱ्याने कारवाईचे धाडस दाखवले नाही अशा गुटखाकिंगचे हवाला रॅकेट आणि घोड्यांच्या बेकायदा बेटींगलाही आळा घातला.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येनिमित्त अमिताभ गुप्ता यांच्याशी दैनिक “प्रभात’ने खास संवाद साधला. ही धाडसी कामगिरी करण्याची त्यांची पद्धत आणि अभ्यासू वृत्ती यामुळेच अवघ्या चार महिन्यांत सामान्य पुणेकरांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. पुण्यात काही पेठांपुरतीच मर्यादीत असणारी गुन्हेगारी गेल्या दशकभरात वाढत्या विस्तारीकरणाबरोबरच उपनगरातही स्थिराऊ लागली. त्याच नेमकेपणाने मागोवा घेतल्याने गुप्ता यांना नव्याने तयार होऊ पाहनाऱ्या टोळ्यांचा अंदाज आला. त्यांच्या कारवाया सुरू होण्यापूर्वीच त्यांना पोलिसी हिसका दाखवल्याने धुमसू पाहणारी उपनगरे सुखाने आपले जीवन व्यतीत करू शकत आहेत.
याची माहिती देताना गुप्ता म्हणाले, पुण्यात येताच आम्ही शहरातील गुन्हेगारांची यादी तयार केली. त्यांच्या गुन्ह्याच्या मोडसची पद्धत समजावून घेतली. त्यामुळेच तीन महिन्यांत समाजाला वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारांवर यापूर्वी होता त्यापेक्षा अधिक जरब बसेल, अशी कारवाई तीन महिन्यांत करण्याचे आश्वासन दिले होते. आता पुणेकरांनी सांगायचे ते पूर्ण झाले की नाही? अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली. अर्थात हे यश मिळण्यासाठी आम्ही सराईत गुन्हेगारांची झाडाझडती आणि उगवत्या गुन्हेगारांची माहिती संकलीत केली. समजतील त्यांना समुपदेशनाने आणि नाठाळ वागणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला, असे त्यांनी सांगितले.
पदाची सूत्रे स्वीकारताच केवळ प्रसिद्धीसाठी कोणतीही घोषणा न करता त्यांनी अभ्यासपूर्वक गुन्हेगारी संपवण्यावर भर दिला आहे. मागील तीन महिन्यांत त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे शहरातील गुन्हेगारीवर जरब बसली आहे.
सक्रिय टोळ्यांचा बंदोबस्त, उगवत्या टोळ्यांवर जरब
पोलिसांकडून गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपडेट करण्यात आले आहेत. संवेदनशील गुन्ह्यांचा तपास विशेष लक्ष देऊन केला जात आहे. सक्रिय टोळ्यांचा बंदोबस्त केला जात आहे. मोक्का, तडीपारी, स्थानबद्धता आदी उपाययोजना करून सामान्य माणसांना या टोळ्यांचा त्रास होऊ नये यासाठी सक्त आदेश देण्यात आले. त्याचवेळी तारुण्याच्या बहरात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांना आधी समुपदेशन करण्याची योजना आखली. न ऐकणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला. छोट्या मोठ्या उत्साहाच्या भरात त्यांचे आयुष्य वाया जाणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यासाठी त्यांनी गुन्हेगारी करण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, असे या फायरब्रॅंड अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हे घडण्याआधीच नियंत्रणाला प्राधान्य
लॉकडाऊनमध्ये अनेक महिने घरात रहावे लागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. तसाच परिणाम गुन्हेगारांच्या मानसिकतेवरही झाला. त्यांच्या वर्तवणूकीत मोठे बदल दिसून येत होते. शुल्लक कारणावरूनही शस्त्र उगारली जात होती. मात्र, पुणे पोलिसांनी वेळीच दखल घेत गुन्हे घडण्याआधीच अनेक गुन्हेगारांना जेरबंद केले. यामुळे लॉकडाऊननंतर गंभीर गुन्हे नियंत्रणात आले.
सायबर सेलमध्ये मोठे फेरबदल
सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस कर्मचारीही तांत्रीक दुष्ट्या सक्षम करण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यास आम्ही प्राधान्य दिले. येणाऱ्या तक्रारींचे स्वरूप पाहून अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पाच स्वतंत्र कक्ष तयार केले. सायबर गुन्हे शाखेतील स्वतंत्र कक्षात वरीष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. येथे नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासात तरबेज करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आलेल्या काही स्वयंसेवी संस्था व तज्ज्ञांच्या सहाय्याने सायबर सेल सक्षम करण्यावर भर दिला असल्याचे या अभ्यासू अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
पोलीस ठाण्याचे, अधिकाऱ्यांचेही रुप पालटणार
पोलीस ठाण्यांचा पारंपरीक ढाचा बदलण्याच्या दृष्टीनेही गुप्ता यांनी पावले टाकली त्याबाबत विचारता ते म्हणाले, पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही काम करताना सुसह्य वाटेल, अशी रचना करण्यावर भर दिला जाणार आहे. तक्रारीसाठी येणाऱ्या नागरिकालाही पोलीस ठाण्यात कोणतीही अडचण येणार नाही, याला प्राधान्य असेल. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही व्यक्तीमत्व विकासाचे धडे दिले जातील. यामध्ये तक्रारदाराशी संवाद कसा साधायचा इथपासून ते कार्यालयात असताना ड्रेसकोड कसा असावा हेही पाहिले जाईल.