पुणे -टेमघर धरण दुरुस्तीसाठी तब्बल 91 कोटी 66 लाख रुपये खर्च झाला आहे. तर, धरणाच्या एकूण कामाकरिता आतापर्यंत 456 कोटी 58 लाख रुपये इतका खर्च झाला आहे. 2016-17 मध्ये गळतीचे प्रमाण 2 हजार 587 लिटर प्रति सेकंद होते. दुरुस्तीमुळे या प्रमाणात 96 टक्के घट झाली असून गळतीचे प्रमाण 197 लिटर प्रति सेकंद आढळल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली आहे. दरम्यान, सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी दुरुस्तीचे काम जुलै 2020 पासून थांबविण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
टेमघर धरणातून पाण्याची गळती होत असल्याबाबत आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. टेमघर धरणातून 2010 पासून गळती सुरू असल्याचे निदर्शनास आले. धरण दुरुस्तीसाठी निधी मागण्यात आला. गळती रोखण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू करण्यात आली होती. ही कामे 100 टक्के पूर्ण करण्यासाठी चालू निविदेतील 52.95 कोटी रुपये व अद्याप निविदा निश्चित न झालेल्या कामासाठी 46.08 कोटी अतिरीक्त निधी आवश्यक आहे. धरणाची गळती रोखण्याच्या कामांकरिता 99 कोटी व धरण सुरक्षितता कामांसाठी 95 कोटी 57 लाख रुपये प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून प्रस्तावावर कार्यवाही करण्यात आहे. टेमघर प्रकल्पास द्वितीय प्रशासकीय मान्याता मिळाल्यानंतर याप्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने हाती घेण्याचे नियोजित असल्याचे फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे.
टेमघर धरणाची तत्कालिन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी 6 ऑगस्ट 2016 मध्ये व 31 ऑगस्ट 2019 मध्ये पाहणी केली असून त्यांना धरणामध्ये गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच, गळती प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर मार्गदर्शनासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या एकूण 10 पाहणी दौरे व बैठका झाल्या असून कामांबाबत समितीने समाधान व्यक्त केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.