पुणे – खडकवासला प्रकल्पातून पाण्याची मागणी कमी करावी, तसेच मुंढवा जॅकवेलमधून प्रक्रिया केलेले साडेसहा टीएमसी पाणी दरवर्षी सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला दिले.
शहराच्या पाणी वापराबाबत जलसंपत्ती प्राधिकरणाकडे झालेल्या सुनावणीत हे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका सध्याच्या 1 हजार 430 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे (एसटीपी) नियोजन करत नाही. खडकवासला प्रकल्पातून पाण्याची मागणी कमी झालेली नाही. महापालिकेने आपल्या पाण्याचा वापर आरक्षणानुसार न करता पाण्याच्या अंदाजपत्रकानुसार मर्यादित केला पाहिजे, अशी भूमिका जलसंपदा विभागाने या सुनावणीदरम्यान मांडली.
महापालिका राज्य सरकारच्या आरक्षणानुसार पाणी उचलत आहे आणि वितरण व्यवस्थेतील तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करत आहे. मात्र, शहराच्या भौगोलिक स्थितीमुळे वेळ लागत आहे. करोनामुळे नवीन जलवाहिनी टाकण्याचे आणि जलमापक बसविण्याचे काम मंदावले असल्याने ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जलवाहिनी टाकण्याचे काम 61 टक्के, तर नवीन जलमापक बसविण्याचे काम 29 टक्के पूर्ण झाले आहे. गळती कमी करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्यानंतर सन 2025 पर्यंत आवश्यक असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांची एकूण क्षमता दैनंदिन 978 एमएलडी एवढी असेल, अशी बाजू पालिकेने मांडली.