* मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नवीन फॉर्म्युला
* मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरच निर्णय
* उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती
पुणे – काश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. आता हा प्रश्न अधिक चिघळल्याने या मुलांसाठी कोटा वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नवीन फॉर्म्युला ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कार्यक्रमानंतर सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सामंत म्हणाले, सध्या काश्मिरी पंडितांचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे. येथील मुलांना राज्यात कुठेही शिक्षण हवे असेल तर ते पुरविण्याची जबाबदारी राज्य शासनाची असेल. काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय सरकारने दोन वर्षांपूर्वीच घेतला. यामध्ये वाढ करण्यात येईल.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून नवा फॉर्म्युला ठरविण्यात येणार आहे. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल किंवा अफगाणिस्तानातील, केंद्र व राज्याने कायमच पुढाकार घेतला आहे. मग तोच न्याय काश्मिरी पंडितांच्या मुलांना देण्यात येईल. या मुलांचे कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.