जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी “मला महाराष्ट्राने नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने “जेएनयू’च्या कुलगुरूपदी पाठविले,’ अशी टिप्पणी केली. दुसरीकडे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी “कुलगुरूंची निवड निरपेक्ष व्हावी,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात दोन शिक्षणतज्ज्ञांची विधाने निश्चितच विचार करायला भाग पाडणारी आहेत. त्यावरून कुलगुरूपदाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी “राज्यातील कुलगुरू निवड प्रक्रियेत मंत्र्यांचा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कोणताही हस्तेक्षप असता कामा नये. या निवड प्रक्रियेत जो घृणास्पद प्रकार सुरू आहे, तो तातडीने थांबला पाहिजे,’ असे म्हटले. “कुलगुरुंची निवड ही निरपेक्ष पद्धतीने झाली पाहिजे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमात “नॅक’चे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुसरी घटना म्हणजे पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक राहिलेल्या डॉ. शांतिश्री पंडित यांची “जेएनयू’च्या कुलगुरूपदी निवड झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावरील उपस्थितांनी “महाराष्ट्राने जेएनयूच्या कुलगुरूपदी पाठविले,’ असे नमूद केले. मात्र, शांतिश्री पंडित यांनी महाराष्ट्राने नव्हे, तर संघाने कुलगुरू म्हणून पाठविल्याने स्पष्ट केले. देशातील नामांकित विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड होऊनही पंडित यांनी स्पष्टच बोलल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सध्या कुलगुरूपदाच्या निवड प्रक्रियेवर चर्चा होण्याचे कारण म्हणजे राज्य सरकार विद्यापीठ कायद्यात नवे सुधारणा विधेयक लागू करत आहे. हे विधेयक मंत्रिमंडळात मंजूरही झाले आहे. मात्र, यावर राज्यपालांची स्वाक्षरी आवश्यक आहे. यात विधेयकात कुलगुरूंची निवड प्रक्रियेत राज्य सरकारचा हस्तक्षेप होणार आहे, असा आक्षेप भाजप आणि शिक्षणतज्ज्ञांनी घेतला आहे. त्यामुळे या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी इतक्यात होईल, अशी चिन्हे नाहीत.
विद्यापीठ कायद्याच्या नव्या सुधारणा विधेयकावरून विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे राजकीय वजन वापरून कुलगुरूपदी निवड होत असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळातून होत आहे. सत्ता कुणाचीही असली तरी सत्ताधारी राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींची कुलगुरूपदी निवड होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. किमान भावी पिढीच्या भविष्यासाठी कुलगुरूंची निवड ही योग्य पात्रतेनुसार व्हावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र, या निवड प्रक्रियेत पारदर्शीपणा नसल्याचे दोन्ही वक्तव्यांतून दिसून येत आहे.
भाष्य
व्यंकटेश भोळा