केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या निर्देशांचा परिणाम ः धावपळ थांबली
पुणे – करोना बाधितांच्या घटत्या संख्येबरोबरच प्लाझ्माची मागणीही घटली असून, आता प्लाझ्मादात्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या नव्या निर्देशांनुसार प्लाझ्माचा वापर कमी करण्याचे आदेश असल्याने हा परिणाम झाला आहे.
फेब्रुवारीपासून करोना बाधितांची संख्या वाढायला सुरूवात झाली. रेमडेसिविर इंजेक्शन्सची जशी मागणी वाढली, त्याच तुलनेत प्लाझ्माचीही मागणी वाढली. अनेक नागरिकांनी अक्षरश: दुसऱ्या गावांमध्ये, शहरांमध्ये जाऊन प्लाझ्माची व्यवस्था केली. डिसेंबर, जानेवारीमध्ये बाधितांची संख्या कमी झाल्याने प्लाझ्मादात्यांची संख्याही कमी होती. वास्तविक करोना होऊन गेल्यानंतर 28 दिवस ते तीन महिन्यांच्या कालावधीत ऍन्टिबॉडिजची संख्या रक्तात जास्त असते. त्यामुळेच जास्त प्रमाणात ऍन्टिबॉडिज मिळू शकतात. परंतु त्यानंतर ती संख्या कमी होते. त्यामुळे एका बऱ्या झालेल्या बाधिताच्या रक्तात जर 400 एमएल प्लाझ्मा मिळू शकला, तर त्याचे चार भाग करून चार रुग्णांनाही दिले जात होते.
त्यामुळे प्लाझ्मादाते शोधणे महाकठीण काम होते. अनेक संस्था, संघटना, सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन प्लाझ्माची व्यवस्था केली. त्यातही अनेक समाजकंटकांनी काळा बाजार केला. गेल्या 15-20 दिवसांपासून बाधितांची संख्या कमी होण्याला सुरूवात झाली आहे. शिवाय रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या वापरावर जसे नियंत्रण आणण्यात आले, तसेच ते प्लाझ्मावरही आणण्यात आले. प्रत्येक बाधित रुग्णाला प्लाझ्मा देण्याची आणि त्याच्या नातेवाईकांना प्लाझ्मा शोधण्यासाठी पिटाळणे बंद करावे, असा फतवा केंद्रीय आरोग्य विभागाने काढला. त्यामुळे त्यावर थोडेतरी नियंत्रण आले.
करोना बाधितांची संख्या खूप झाल्याने प्लाझ्मा बऱ्यापैकी मिळू शकतो. परंतु मागणीच नसल्याने आता त्याचे संकलनही रक्तपेढ्यांनी जवळपास बंद केले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ही मागणी आता पाच ते दहा टक्केच राहिली आहे. संस्था, संघटनांनीही आता प्लाझ्मादाते शोधणे बंद केले आहे. त्यामुळे आता प्लाझ्मासाठी जी ओढताण होती, ती बऱ्यापैकी कमी झाली आहे.
– डॉ. अतुल कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढी