मंचर : वसतिगृहापासून वंचित असणाऱ्या जुन्नर येथील १७० विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या शिष्टमंडळास गुरुवार, दि.१७ रोजी मुंबई येथील लोहगड निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता.आंबेगाव येथील अधिकाऱ्यांना कार्यावाहीचे आदेश देखील दिले आहेत.
जुन्नर येथील ग्रामीण आदिवासी भागातील १७० आदिवासी मुलींचे शैक्षणिक वर्ष संपत आले असताना देखील वसतिगृह प्रवेशापासून वंचित आहेत. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना शैक्षणिक संस्थांपर्यंत येण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. यावर्षी त्यांना वसतिगृह प्रवेश मिळाला नाही तर पुढील दोन – तीन वर्षे या मुली शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे १७० आदिवासी विद्यार्थीनींना वसतिगृहात प्रवेश द्यावा, या मागणीला घेऊन २८ एप्रिल २०२५ रोजी पासून किल्ले शिवनेरी ते वर्षा बंगला, मुंबई असा लाँग मार्च काढण्याची घोषणा एसएफआयने केली होती.
या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि.१७ रोजी आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत मंत्री महोदयांनी प्रकल्प अधिकारी, घोडेगाव यांना आदेश देत प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थिनींना वसतिगृहासाठी इमारत घेऊन सोयी – सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या.
तसेच एकही आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने काम करावे, असेही मंत्री महोदय म्हणाले.या बैठकीस स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय) चे राज्य सहसचिव विलास साबळे, राज्य सचिव मंडळ सदस्य नवनाथ मोरे,पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे, निशा साबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते दत्ता गवारी, बाळासाहेब साळवे उपस्थित होते. तर प्रकल्प कार्यालय, घोडेगाव चे प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई, गृहपाल विपुल टकले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.