हिंजवडी: जागतिक दर्जाच्या हिंजवडी आयटीपार्कचा सीमाभाग असलेल्या नेरे कासारसाई परिसरात गेली आठ दिवसापासून दोन बिबट्यांच्या वावरामुळे दहशत निर्माण झाली आहे. नेरे गावातून संत तुकाराम साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याला उसाच्या शेतात बिबट्यांचे दर्शन होत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेली पाच सहा दिवसापासून रात्रीचे वेळी नेरे येथील हनुमंत पायगुडे यांच्या 7 ते 8 कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या असून रात्रीचा प्रवास करणाऱ्या लोकांना तसेच पाळीव कुत्र्यांवर हा बिबट्या धावून येत असल्याने त्याच्या दहशतीने जागे होणाऱ्या नागरिकांना देखील या बिबट्याचे होत आहे. अशी माहिती नेरे गावातील प्रत्यक्षदर्शी शेतकरी पंडित पायगुडे यांनी दिली. शुक्रवारी (दि 11) मध्यरात्रीला सुमारे साडेअकराच्या सुमारास उसाच्या शेतात बांधावर बसलेल्या बिबट्याचे दर्शन झाल्याचे ताथवडे येथील किशोर बलकवडे यांनी पाहिले. आपल्या परिवारासह ते चारचाकी गाडीतून घरी जात असताना त्यांना बांधावर बसलेला बिबटया दिसला.
बिबट्याचे परिसरातील वास्तव्य बाबत पायगुडे यांनी ग्रामपंचायत व वनविभागाला कळविले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंजाचे ठसे नेले असल्याची माहिती सरपंच दत्तात्रेय जाधव यांनी दिली.
ते म्हणाले बिबट्याचा सातत्याने वावर होत असल्याने गावातील नागरिकांमध्ये घबराट व त्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त केला पाहिजे अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार . वनअधिकारी सांगतात की बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याकरिता नागपूर मुख्यालयातून परवानगी घ्यावी लागते . आज पुन्हा बिबट्याचे दर्शन घडल्याने वनविभागाची टीम नेरे येथे भेट देणार असून गावकर्यांमध्ये जनजागृती करणार आहे असेही सरपंच दत्तात्रेय जाधव यांनी दै. प्रभातशी बोलतांना सांगितले.