संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व्यवस्थापनाची मागणी
पुणे – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा विश्रांतवाडी (फुलेनगर) येथील विसावा या वर्षीपासून बीआरटी मार्गात होण्याची शक्यता आहे. हा विसावा फुलेनगर येथील दत्त मंदिरात असतो. मात्र, विश्रांतवाडी बीआरटी मार्गातून पालखी सरळ आल्यानंतर पुन्हा प्रचंड गर्दीत पालखी दत्तमंदिराच्या दिशेला वळविण्यात मोठा वेळ जातो. त्यामुळे महापालिकेने विसाव्यासाठी बीआरटी मार्गातच सुविधा करून द्यावी, अशी मागणी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. या मागणीवर निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महापौर टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापौर टिळक यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि पालखी मार्गात येत असलेल्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मार्गाची संयुक्त पाहणी केली. यावेळी देसाईही उपस्थित होते.
महापौर म्हणाल्या, यंदाच्या पालखी सोहळ्यासाठीच्या तयारीच्या अनुषंगाने हा दौरा आयोजित केला होता. यावेळी पालखीचे विश्वस्तही उपस्थित होते. त्यांनी प्रामुख्याने दोन मागण्या केल्या असून त्यात फुलेनगर येथील पालखी विसावा बीआरटी मार्गात करण्याची विनंती करण्यात आली आहे. पालखी बीआरटी मार्गातून सरळ आल्यानंतर दत्त मंदिराच्या दिशेला जाण्यासाठी तिला वळसा घालावा लागतो. या ठिकाणी असलेल्या गर्दीमुळे पालखीच्या सारथ्यांसाठीच्या बैलांना पालखीसह वळसा घालणे कठीण बनते. या शिवाय, पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांसमवेत मोठ्या प्रमाणात ट्रक असल्याने महापालिका हद्दीत या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पुढील आठवड्यात बैठक
या दोन्ही मागण्यांपैकी पालखीतील वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र, फुलेनगर येथील विसाव्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून पुढील आठवड्यात त्यासाठी पुन्हा बैठक बोलविण्यात येणार आहे. त्यापूर्वी या भागातील नगरसेवक तसेच संबंधितांशी चर्चा करून त्यानंतरच पालखी विसाव्याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.