पुणे, दि. 10 -महापालिकेच्या पाणी वापराबाबत जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे सुरू असलेल्या सुनावणीत महापालिकेकडून शहरात 30 ते 40 टक्के पाण्याची गळती जुन्या जलवाहिन्यांमुळे होत असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर आता शहरात पाण्याचे मीटर बसविताच; पालिकेने घुमजाव करत शहरात पुणेकरांकडून जादा पाणी वापर होत असल्याचा सूर आळविण्यात आला असून, मीटर बसविलेल्या पुणेकरांना जादा पाणी वापरत असल्याचा नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये नाराजीचा सूर असून, महापालिकेने बजाविलेल्या नोटीसा चुकीच्या पद्धतीने बजावल्या असून, त्या तातडीने मागे घेण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.
महापालिका केवळ मीटरद्वारे येणारे पाणी मोजत आहे. मात्र, त्याच वेळी नेमके पाणी कोणी वापरले, निकषानुसार तेवढेच पाणी वापरले हे कसे निश्चित केले, इमारतीत अथवा घरांमध्ये किती नागरिक राहतात, हे कसे निश्चित केले याचे कोणतेही उत्तर प्रशासनाकडे नाही. त्यामुळे महापालिका शहरात पाणी वाचवित आहे हे प्राधिकरणाला दाखविण्यासाठी पालिकेने हा नोटीसांचा घाट घातल्याचे समोर येत आहे.
साडेचार हजार पुणेकरांना नोटीसा
महापालिकेने समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरात 1 लाख मीटर बसवले आहेत. त्यापैकी 90 हजार मीटरचा दैनंदिन पाणी वापर किती आहे, याची माहिती संकलित केली आहे. त्यामध्ये हजार ग्राहकांनी जास्त पाण्याचा वापर केल्याचे निदर्शनास आले असून, आत्तापर्यंत 4 हजार 600 जणांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. प्रति दिवस प्रतिमानसी 150 लीटर पर्यंत पाणी वापरता येते, पण त्यापेक्षा जास्त पाणी वापर होत आहे. हे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान असल्याने कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे पाणी वापर कमी करा, असे महापालिकेने नोटिशीमध्ये नमूद केले आहे. पण प्रत्यक्षात, हा पाणी वापर पालिकेने कसा मोजला हा प्रश्न अनुत्तरित आहे. पालिका केवळ मीटरमधून सोडलेले पाणी मोजत असून, त्या आधारावर पालिकेने या नोटीसा बजाविल्या आहेत.
शहरात स्वत:चे बैठे घर असलेल्या तसेच मोठ्या सोसायट्यांना पालिकेने मीटर बसविले आहेत. पण, प्रत्यक्षात अनेक मोठ्या इमारतींना संप वेल तसेच इमारतीच्या वरही पाण्याच्या टाक्या असतात. त्यांची क्षमता बांधकाम व्यावसायिक निश्चित करतात. त्यानुसार पालिकेने मीटर बसविले तरी, पालिकेचे संबंधित भागात जेवढा वेळ पाणी पडेल तेवढा वेळ टाकी भरत राहते. त्यानंतर स्वयंचलित यंत्रणेद्वारे हे पाणी वरच्या टाकीत जाते. तिथून ते नागरिकांच्या घरात जाते. त्यामुळे कोणी किती पाणी वापरले हे निश्चित करताच येणार नाही. मात्र, पालिकेने मीटर लावण्यासाठी नेमलेल्या कंपनीने सोसायटीमधील सदनिका, सोसायटीचे सुरक्षारक्षक यांच्याकडून माहिती घेऊन परस्परच पाणी वापर निश्चित करून या नोटीसा बजाविल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नोटीसा तातडीने रद्द कराव्यात
महापालिकेने दिलेल्या या नोटीसा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्या असून, त्या त्वरित थांबविण्यात याव्यात, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. महापालिकेकडून मिळकतकराप्रमाणेच अचानक कोणतीही सूचना न देता या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. याशिवाय पालिकेने कोणत्या निकषांचा आधार घेत हा पाणी वापर निश्चित केला आहे, याचेही उत्तर प्रशासनाकडे नसल्याने तातडीने या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणी आम आदमी पक्षानेही महापालिका आयुक्तांकडे केली आहे.