येरवडा, दि. 21 (प्रतिनिधी) -दिवाळी सणाचा पहिला दिवस उजाडला तरी नगररोड क्षेत्रीय कार्यालयात झाडणकाम करणाऱ्या 400 कंत्राटी कामगारांना मागील तीन महिन्यांचा पगार मिळालेला नसल्याने दिवाळीच्या पहिल्या दिवशी या कामगारांना आंदोलन करावे लागले.
आधीच्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नव्याने निविदा काढुन त्या ठेकेदाराच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात दोन महिन्याचा कालावधी लावल्याने या कामगारांच्या पगाराला उशीर झाल्याचे सांगितले जात असले तरी या मुदत संपण्याच्या अगोदर निविदा प्रक्रिया का राबविण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 14 कोटीपेक्षा अधिक रकमेची निविदा प्रसिद्ध 400 कंत्राटी कामगारांची त्या निविदेची सर्व प्रक्रिया उशिरा झाल्याने ऐन दिवाळीचा शुक्रवार (दि.21)
पहिला दिवस असतानाही गेल्या 2-3 महिन्यांपासून रखडलेला पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. हातावर पोट असणाऱ्या या गरीब कष्टकऱ्यांचा पगार रखडवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या गरीबांना घरभाडे त्यांच्या मुलांची शैक्षणिक फी, दवाखाना इत्यादी खर्च भागवायचे असतात. दिवाळी सारख्या सणात इतर कामगारांना बोनस मिळत असताना या सफाई कामगारांना पगारच देण्यात आला नसल्याने 400 कामगारांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारमय झाली आहे.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची चूक असल्याने या अधिकाऱ्यांनी या गरीब कामगारांवर उसनवारीची वेळ आणली आहे. नगररोड क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही तसेच याबाबतच्या मेसेजला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
नेहमीप्रमाणे यावेळीही निविदेला उशिर का झाला, याचे उत्तर सहाय्यक आयुक्तांनी दिले पाहिजे. हा उशिर ज्यांच्यामुळे झाला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आयुक्तांनी तसे आदेश द्यावेत. हा विलंब ज्यांच्या निष्काळजीमुळे व दफ्तर दिरंगाईमुळे होतो ते झारीतील शुक्राचार्य कोण हे समोर आले पाहिजे.
– आशिष माने, सामाजिक कार्यकर्ते