जिल्हाधिकारी कार्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागाला प्रस्ताव
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने महापालिका हद्दीमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. याच धर्तीवर ग्रामीण भागात दि. 25 डिसेंबर ते दि.5 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागाला पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये संचारबंदीचा आदेश लागू होणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनी शहरालगतच्या गावांमध्ये तसेच नगरपालिका हद्दींमध्ये रात्री संचारबंदी लागू करण्यात यावी, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाने तळेगाव दाभाडे, चाकण, आळंदी, तळेगाव या नगरपरिषदा तसेच चाकण-म्हाळुंगे एमआयडीसी, हिंजवडी आयटी पार्क या क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच ख्रिसमस व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ग्रामीण भागात पर्यटकांची गर्दी होते. यामध्ये लोणावळा, ऍम्बी व्हॅली, भुशी डॅम, मुळशी धरण, ताम्हिणी घाट, सिंहगड किल्ला, खडकवासला तसेच ग्रामीण भागातील फॉर्म हाऊस, रिसॉर्ट आदी ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे.
मावळ, मुळशी, हवेली ता तालुक्यांतील संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये तसेच शिरूर तालुक्यातील कोरेगाव भिमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी आणि वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश पारित होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागात रात्री संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.