pune news – ‘शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये’ अशी म्हण आहे. याचाच प्रत्यय एका प्रकरणात आला आहे. धरणाच्या पाण्याची पट्टी वसुल करण्यासाठी गेलेल्या अधिकऱ्याला मारहाण आणि धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या बाप-लेकाला न्यायालयाने २० वर्षांनी शिक्षा सुनावली आहे.
२ वर्षे तुरूंगवास आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.आय. पेरमपल्ली यांनी सुनावली. दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. २००५ साली झालेल्या घटनेत २०२५ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोपट भाऊसो घोडे (वय ७३) आणि त्याचा मुलगा बाळू (वय ४३, दोघेही, रा. हाजी टाकळी, ता. शिरूर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. मंचर पाटबंधारे सिंचनचे तत्कालीन शाखाधिकारी रविंद्र हांडे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. १८ मार्च २००५ रोजी ही घटना घडली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे प्रदीप गेहलोत यांनी ६ साक्षीदार तपासले. फिर्यादी कर्मचाऱ्यासह डिंबे धरणापासून शिरूर तालुक्यात वापरलेल्या पाण्याची पट्टी गोळा करत होते. घटनेच्या दिवशी ते आणि कर्मचारी घोडे यांच्या घरापाशी गेले.
‘पाणीपट्टी का भरत नाही’ अशी विचारणा केली. त्यावेळी ‘पाणी आताच आले आहे, पाणीपट्टी भरू शकत नाही’ असे बाळू म्हणाला. त्यावेळी दोन वर्षांपासून पाणीपट्टी थकल्याचे फिर्यादींनी सांगितले. त्यावेळी फिर्यादी आणि कर्मचारी यांना धक्काबुक्की आणि मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एच.एम.लगड यांनी तपास केला. त्यांचा आता मृत्यू झाला आहे. सत्र न्यायालय पैरवी अधिकारी म्हणून विद्याधर निचित, परवी कर्मचारी म्हणून हवालदार बाळासाहेब गदादे, कॉन्स्टेबल रेणूक भिसे यांनी काम पाहिले.