पुणे : करोना महामारीच्या संकटामुळे अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याततच, इयत्ता दहावी, बारावी आणि शेवटच्या वर्षाच्या परीक्षा महिन्याभरावर आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची अडचण लक्षात घेऊन महावितरणने नागरिकांना चार हप्त्यांमध्ये बील भरण्यास मुभा द्यावी तसेच वीज तोडू नये अशी मागणी भारतीय भारतीय जनता पार्टी पुणे शहर झोपडपट्टी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने रास्ता पेठ येथील महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांना देण्यात आले. आघाडीचे अध्यक्ष विशाल पवार, सरचिटणीस अजय शिंदे, प्रदिप रणदिवे, महेश सकट, तेजस गाडे, सचिन ससाणे, सागरसिंग टाक हे पदाधिकारी उपस्थित होते.
इयत्ता दहावी, बारावी आणि शेवटच्या वर्षाच्या परीक्षा, असहय उकाडा आणि कोविड-19 महामारीचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर गेलेल्या अनेकाच्या नोक-या, बुडालेले धंदे यामुळे अनेक झोपडपट्टीवासी, मध्यमवर्गीय, नोकरदार तसेच छोटे-मोठे व्यवसायीक यांचे रोजचे खायचे हाल होत आहेत.
म्हणून महाराष्ट्र शासन विज वितरण कंपनीने थकबाकी असलेल्या ग्राहकांचे विज जोड तोडू नये तसेच जे ग्राहक बील भरायला तयार आहेत पण एकरकमी बील भरू शकत नाहीत त्यांना चार हप्त्यात बील भरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. तर या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन या वेळी तालेवार यांनी दिले.