पुणे –महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील विविध विभागांत गेल्या अनेक वर्षांपासून तळ ठोकून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी वाढली आहे. ती मोडीत काढण्यासाठी खांदेपालट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध, राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना, वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा, आयआयएमसी, सेवा प्रवोशोतर विभागीय परीक्षा, विविध बाह्य परीक्षा, डी.एल.एड, संगणक व मॅन्युअल टायपिंग आदी विविध परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येतात. परीक्षा परिषदेअंतर्गत या परीक्षांच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था आहे.
बऱ्याच वर्षांपासून काही ठराविक अधिकारी, कर्मचारी हे ठराविकच परीक्षांचे कामकाज करत आहेत. सर्वांना सर्वच परीक्षांचे कामकाजाची माहिती मिळायला हवी यासाठी आता खांदेपालट करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व आयुक्त तुकाराम सुपे, उपायुक्त हारुन आत्तार, शैलजा दराडे यांच्या बैठकीत घेतला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे खांदेपालट करत असताना समुपदेशनाचे तंत्र अवलंबण्यात येणार आहे.
काही ठराविक अधीक्षक, सहायक आयुक्तांकडे वर्षांनुवर्ष त्याच त्या परीक्षांचे कामकाज असल्याने अधिकाऱ्यांमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे.
काही अधिकारी सक्षम असतानाही त्यांच्याकडे दुय्यम दर्जांच्या परीक्षांची जबाबदारी असल्याने नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यात बदलीच्या हंगामात परीक्षा परिषदेतील एकाही अधिकाऱ्यांची अन्यत्र कोठेही बदली झाली नाही. बदलीस पात्र असतानाही का बदल्या झाल्या नाहीत, कोणी बदल्या थांबविल्या असा प्रश्नही उपस्थित करण्यात येवू लागला आहे. दरम्यान, आता किमान काही अधीक्षकांच्या परीक्षांच्या कामकाजात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.