पुणे –स्वराज्याचा ठेवा असलेल्या किल्ले सिंहगडावर वनविभाग आणि पीएमपीने महाराष्ट्र दिनापासून ई- बस सेवा सुरू केली. प्रदूषण रोखण्यासह, पर्यंटकांना शिस्त लावणे आणि घाटात तासन्तास होणारी वाहतूक कोंडी रोखणे या उद्देशाने सुरू झालेली ही सेवा कौतुकास्पद होती. मात्र, एखादा मोठा बदल करताना आराखडा, नियोजन आणि अभ्यास करणे आवश्यक होते. मात्र, तसे काहीही न झाल्याने ही सेवा सुरू झाल्यापासून कौतुक होण्याऐवजी टीकेची धनी झाली. अखेर ही सेवा तात्पुरती बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
अपुऱ्या ई-बस असणे, बसची लांबी घाट रस्त्यांच्या वळणाच्या तुलनेत जास्त असणे, प्रशिक्षित चालक नसणे, गडावर तसेच पायथ्याला चार्जिंग स्टेशनची सुविधा नसणे, सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या जास्त असतानाही पीएमपीकडून केवळ नियोजनाचे कागदी घोडे नाचविणे या पलीकडे काहीच करण्यात येत नाही. त्यामुळे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी हजारो प्रवासी गाडीसाठी गडावर तासन्तास लहान मुलांसह ताटकळत आहेत. अवघ्या दोन आठवड्यांत चार वेळा बसचा अपघात झाला.
एका अपघातात तर प्रवाशांनी भरलेली बस सुरक्षा कठड्याला धडकली. सुदैवाने बसवर नियंत्रण मिळविल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, त्यानंतरही पीएमपी अथवा वन विभाग आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्यास तयार नसून गडावर पर्यावरण संवर्धनाच्या नावे ई-बसचा “अट्टहास’ नेमका कशासाठी आणि कोणासाठी? सुरू केली होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तीन-तीन तास रांगेत थांबणे अशक्य
बस आहेत, पण चार्जिंग नाही म्हणून प्रवाशांना गडावर तीन-तीन तास बसची वाट पाहावी लागते. बसची सुविधा असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना घेऊन येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना तासन्तास रांगेत थांबवणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना तरी शोभते का? गडावर बस असतात तिथे कुठेही आसन व्यवस्था, अथवा पिण्यासाठी पाणीही नाही. साधे दिवेही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अंधारात जीव मुठीत घेऊन पर्यटक गडावर ताटकळत उभे असतात.
झाली तेवढी फजिती पुरे…
ई-बस सेवा सुरू करण्याचे प्रमुख कारण प्रदूषण थांबवणे हे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता तूर्तास ई-बसची लांबी, चार्जिंग पॉइंट, गड तसेच पायथ्यावरील बसथांब्यावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आधी पुरवणे आवश्यक आहे. पण, तसे काहीही नसताना प्रशासनाने प्रवाशांची हेळसांड चालवली होती. त्यामुळे झाली तेवढी फजिती पुरे म्हणत प्रशासनाने यापुढे सुविधा पुरवूनच बससेवा सुरू करणे योग्य असेल.
सामान्य पुणेकरांचे प्रशासनाला प्रश्न
*सिंहगड मार्ग घाटात अडचणीची वळणे आहेत. ई-बस सेवा सुरू करण्यापूर्वी ही स्थिती माहिती नव्हती का?
*बस सुरू करण्यापूर्वी रस्ते रुंदीकरण का केले नाही?
*चार्जिंग स्टेशन्सची संख्या अपुरी का?
*सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे प्रशासनाने नियोजन का केले नाही?