पुणे – सध्या शहर परिसरातील रहिवासी भाग, सोसायट्यांत वटवाघळांचा वावर वाढल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. यामुळे “निपाह’ विषाणूबरोबरच इतरही काही आजार पसरण्याची भीती आहे.
दरम्यान, “रहिवासी भागांत वटवाघळांचे वाढते प्रमाण हे जैवविविधतेच्या ऱ्हासाचे गंभीर लक्षण आहे,’ असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग, सिंहगड रस्ता, धायरी, सहकारनगर परिसरांत वटवाघळांचा वावर खूप वाढला आहे, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. “सारी’, “इबोला’, “निपाह’, “करोना’ यांसारख्या विषाणूंची उत्पत्ती या प्राण्यामुळे झाल्याच्या चर्चा यापूर्वी झाल्या. त्यातच आता शहरात वटवाघळांच्या वाढत्या वावरामुळे आरोग्याच्या इतरही अनेक समस्या उद्भवण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात योग्य पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
प्रत्येक प्राणी-पक्ष्यांत थोड्याफार प्रमाणात विषाणूंचे अस्तित्व असते, तसेच ते वटवाघळातही आहे. योग्य खबरदारी घेतल्यास मानवाला त्यापासून धोका नाही. सर्वसामान्यपणे वड, उंबर, पिंपळ यां झाडांवर आढळणारे हे प्राणी गेल्या काही वर्षांत त्यांचा अधिवास नष्ट झाल्याने आंबा, चिकू या फळझाडांवर अधिवास तयार करत आहेत. वटवाघळांच्या अन्नसाखळीतील या बदलामुळेच रहिवासी भागात त्यांचा वावर वाढत असल्याचे दिसत आहे.
– महेश गायकवाड, वटवाघळांचे अभ्यासक
सदाशिव पेठेत आमच्या सोसायटीच्या पार्किंमध्ये वटवाघळांचा वावर जास्त आहे. अनेकदा त्यांच्या मूत्रविसर्जनानंतर येणाऱ्या उग्र वासाने डोकेदुखीचा त्रास होतो. त्याचबरोबर बरेचदा नागरिक या ठिकाणाहून ये-जा करतात. अशावेळी त्यांच्या माध्यमातून विषाणूप्रसार होण्याची भीती वाटते.
– हर्षदा खेर, नागरिक