“सिंबायोसिस’ गोलमेज परिषदेत केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांचे मत
पुणे – नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे कोणताही नवीन दस्तऐवज नसून ते एक “ज्ञान दस्तऐवज आहे, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज येथे व्यक्त केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजित गोलमेज परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्रालय अतिरिक्त सचिव राकेश रंजन, सिंबायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां .ब. मुजुमदार, प्रधान संचालक डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते.
प्रधान म्हणाले, “करोनामुळे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या धोरणासाठी देशातील अनेक शैक्षणिक संस्था योगदान देत आहेत. केंद्र सरकार शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक विकासासाठी कटिबद्ध आहे. आज आपल्या देशाला बहुविद्याशाखीय शिक्षण पद्धतीची गरज आहे. पुण्याचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.
शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, ग्लोबल सिटिझन या संकल्पनांची सुरुवात पुण्यातून झाली. या संकल्पना डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या मनात होत्या. ज्यांनी प्रामुख्याने परदेशी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सिंबायोसिससारखी संस्था सुरू केली. आपल्या देशात आज या संकल्पना उदयास येत आहेत. त्यांची शिक्षण क्षेत्रासाठी असलेली दूरदृष्टी दिसून येते.’
डॉ. शां .ब. मुजुमदार म्हणाले, “पुणे आज जो विचार करते तो विचार उर्वरित भारत देशात उद्या केला जातो. महाराष्ट्रात आज 100 वर्षांहून अधिक जुन्या शिक्षण संस्था आहेत. आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व शाश्वत आहे. देशातील शैक्षणिक संस्था भारताला विश्वगुरू बनवू शकतात.’ डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. रजनी गुप्ते यांनी आभार मानले.