पुणे, दि. 21 -लस निर्मिती क्षेत्रात यापुढे “नॉलेज’, “टेक्नॉलॉजी’, “सोशल’ आणि “इकॉनॉमी’ या गोष्टींवर भर दिला गेला पाहिजे, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी व्यक्त केले.
“सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि “विकसनशील देशांमधील लस उत्पादक नेटवर्क’ तर्फे तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन डॉ. मांडविय यांच्या हस्ते झाले. यावेळी “जागतिक आरोग्य संघटने’च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन, “सिरम’चे संस्थापक अध्यक्ष सायरस पुनावाला, मुख्य सीईओ अदर पुनावाला, “डीसीव्हीएमएन’चे साई डी. प्रसाद आदी उपस्थित होते. या परिषदेला जागतिक सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील 400 पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.
भारतात लसींच्या निर्मितीच्या दृष्टीकोनातून शोध आणि विकासाकडे अधिक लक्ष दिले जावे. जगभरात उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जावे. “सिरम’ने ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राजेंकाकडून तंत्रज्ञानाची मदत घेतली म्हणून मोठे उत्पादन होऊ शकले, असे मत डॉ. मांडविय यांनी मांडले.
“सोशल’ विषयात परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण लस उपलब्ध करणे यासाठी प्रयत्न करणे, जर उत्पादन वाढवले तर, लागत कमी होईल. त्यामुळे भारतात बनवलेले औषध प्रदेशातही जाईल. औषध क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या एकत्रित आल्या पाहिजे. करोना सारख्या आजारावर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. मांडविय यांनी नमूद केले.