राजगुरूनगर – लग्न तिथी, बॅंकांचा संप आणि विकेंडमुळे शुक्रवारी (दि. 31) पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर शहरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी घायकुतीला आले होते. राजगुरूनगरात झालेल्या वाहतूककोंडीमध्ये अनेक प्रवासी अडकून पडले होते. महिना अखेर, बॅंकांचा संप, लग्न तीथी यामुळे मोठ्या संख्येने वाहने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होती. राजगुरूनगर येथील अरुंद पूल आणि वाहनचालकांची बेशिस्तपणा यामुळे राजगुरुनगर शहरात वाहतूक कोंडी नित्याची ठरली आहे.
आज सकाळपासूनच महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासन कोंडी सोडविण्याचे काम करीत असतानाही असतानाही केवळ वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे नाशिक महामार्गावर वाहतुकीची कोंडी अनेकांनी अनुभवली. राजगुरूनगर शहर, खेड घाट ही वाहतूक कोंडीची मुख्य ठिकाणे असून दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत आहे.
राजगुरूनगर शहरातकच अरुंद पूल आणि त्यालगत एसटी बसस्थानकमुळे वाहतूक कोंडी नित्याची आहे. नाशिककडे जाणाऱ्या एसटी बसेस अरुंद पुलाच्या बाजूने स्थानकातून नाशिकच्या दिशेने जात असल्याने दोन्ही बाजूकडील वाहने थांबवावी लागतात, त्याच्याच पुढे शहरात व वाड्याला जाण्याचा रस्ता असल्याने शहरातील वाहतूक कोंडी होत आहे.
एसटी बसस्थानकापुढे पाबळ चौक असल्याने याठिकाणी बेशिस्त वाहनचालक वाहने चालवतात. त्यामुळे वाहन कोंडी होते. त्यापुढे पोलीस ठाण्याजवळ शहरात जाणारा पर्यायी असल्याने पोलीस ठाणे असतानाही वाहनचालक वाहने मध्ये घुसवतात. त्याच्याच पुढे भीमेवरील अरुंद पूल असल्याने वाहनकोंडी होत आहे. पुढे टोल नाक्यावर सध्या गर्दी होत आहेत.
प्रशासन उदासीन
राजगुरूनगर शहरातील वाहतूक कोंडी नित्याची झाली असून प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना केली जात नाही. मध्यंतरीच्या काळात संपूर्ण रस्त्यावर ड्रम आणि बॅरिकेट लावल्याने वाहतूक सुरळीत होत होती; मात्र पोलिसांनी व महामार्ग प्राधिकरणने ते हटविल्याने आता पुन्हा शहरात वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.