वडगावशेरी, दि. 1 (प्रतिनिधी) -जलद वाहतुकीसाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रशासनाने तयार केलेली बीआरटी वाहतूक यंत्रणा “ब्रेकडाऊन’ झाली आहे. या मार्गात खासगी वाहनचालक घुसखोरी करीत असून हक्काचा मार्ग असलेल्या पीएमपीलाच या मार्गात “नो एन्ट्री’ असल्याची स्थिती निर्माण झाल्याने पीएमपीएल प्रशासन आणि प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
येरवडा ते आपले घर या मार्गावर बीआरटी सुरू आहे. सध्या मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी हा मार्ग बंद तर काही ठिकाणी सुरू आहे. प्रवाशांना या सेवेचा फायदा होतो. मात्र, बीआरटी मार्गात खासगी वाहनचालक घुसखोरी करीत असल्याने या मार्गातून बसेस उशीरा धावत आहेत. याउलट बीआरटी मार्गाबाहेरून बस नेल्यास तीे स्थानकात वेळेवर पोहचत असल्याचा अनुभव चालक-वाहक सांगतात.
या मार्गावर सायंकाळी चार नंतर खासगी वाहनांची मोठी रांग लागलेली असते. या कारणातून पीएमपी चालकांना त्यांच्या बसेस लगतच्या रस्त्यावरून न्याव्या लागत आहेत. याबाबत प्रवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असताना पीएमपी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत पीएमपीचे अध्यक्ष ाणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
प्रशासकीय वादात प्रवासी वेठीस…
येरवडा येथील बीआरटी मार्गात खासगी वाहन चालकांची घुसखोरी होत असताना वाहतूक पोलीस काय करतात? असा प्रश्न पीएमपी चालक तसेच प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. पीएमपी प्रशासन आणि महापालिका प्रशासनाच्या तांत्रिक वादातून वाहतूक पोलीस ही जबाबदारी टाळत असल्याचे चर्चा असली तरी यातून पीएमपीचे प्रवासी वेठीस धरले जात आहेत. सायंकाळी चार वाजल्यानंतर वाघोलीवरून पुण्याकडे येणारी आणि वाघोलीकडे जाणारी एकही बस बीआरटी मार्गातन धावू शकत नाही. त्यामुळे या मार्गातील थांब्यावर तासन् तास प्रवासी थांबलेले असतात.
बीआरटी मार्गातील खासगी वाहनांची घुसखोरी यातून पीएमपीच्या प्रवाशांची होणारी गैरसोय याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा दाद मागितली आहे. पोलीस, पीएमपी आणि महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, आतापर्यंत ही समस्या सोडविण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता, आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.
– उषा कळमकर, माजी नगरसेविका