पुणे (प्रभात वृत्तसेवा) – बिबवेवाडी येथील 13 वर्षीय कब्बडीपटूच्या खुनाच्या घटनेनंतर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच, शहराच्या चौकाचौकात अल्पवयीन मुलांची टोळकी महिला तसेच मुलींची छेड काढत असून त्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
त्यामुळे घरातील मुलींना घराबाहेर पाठविण्यास नागरीक घाबरत असून पोलीसांच्या माध्यमातून शहरात गस्त वाढविली तसेच टवाळखोर आणि अल्पवयीन गुन्हेगारांना वेळीच जरब घालावी अशी मागणी सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मनसेच्या महिला उपाध्यक्ष ऍड रूपाली ठोंबरे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, राष्ट्रवादीच्या किरण सातपूते, मनसेच्या वंदना साळवे, लावण्या शिंदे,मनिषा कावेडीया यावेळी उपस्थित होत्या. यावेळी पोलीस आयुक्तांकडून शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांसह प्रस्तावित कार्यपध्दतीची माहिती देण्यात आली.
बिबवेवाडी प्रकरणाची सुनावणी फास्टस्ट्रॅक न्यायालयात व्हावी, सरकारी वकील म्हणून ऍड. उज्जवल निकम, ऍड. उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तसेच शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढविणे आवश्यक असून त्याबाबत तातडीनं पावले उचलून महिलांना सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी यावेळी या महिला पदाधिकाऱ्यांकडून पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली.