कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांचा अग्निशमन दलावरच विश्वास
पुणे – शहरात पहिल्याच पावसाने दाणादाण उडाल्यानंतरही पालिकेने आपत्ती निवारण कक्ष सुरू केलेले नाहीत. तसेच संपर्क क्रमांकही जाहीर केलेले नाहीत. परिणामी, शुक्रवारच्या पावसानंतर अग्निशमन दलाकडे तब्बल 30 ते 35 कॉल नागरिकांनी केले. मात्र, त्याच वेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अवघे पाच ते दहाच फोन आले होते. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाबाबत अद्यापही पुणेकरांना माहितीच नसल्याचे यावरून समोर येत आहे.
दरवर्षी महापालिकेकडून साधारणपणे दि. 1 जूनच्या आसपास आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. पावसाळ्यात दुर्घटना घडल्यास तत्काळ उपाय योजनांसाठीचे नियोजन आराखड्यात नमूद असते. प्रामुख्याने बाधित होऊ शकणारी क्षेत्र, पूरस्थिती अथवा इतर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास प्रत्येक विभागाने काय जबाबदारी सांभाळायची? नागरिकांनी कोणाशी संपर्क साधायचा? त्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक अशी माहिती असलेला हा आराखडा असतो. मात्र, या वर्षी 11 जून उजाडला आणि शहरात पूर्वमोसमी पाऊस झाला, तरी अद्याप पालिकेने हा आराखडाच तयार केलेला नाही.
त्यामुळे नेमक्या कोणत्या विभागांनी काय जबाबदारी सांभाळायची? याची माहिती आणि हा आराखडा तयार नसल्याने अनेक विभागांना नाही. तर, हा आराखडा तयार करण्याचे कामही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडेच आहे.
आयुक्तांचे आदेश कागदावरच…
शहरात गेल्या काही वर्षांत अचानक अतिवृष्टीच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत शहराच्या एखाद्या भागात तत्काळ मदत पोहचविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून त्यांचे संपर्क क्रमांक शहरातील नागरिकांसाठी जाहीर करण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागस दिले होते. मात्र, त्याबाबत काहीही हालचाल झालेली नाही.