पुणे – महापालिका हद्दीतील नागरिक हद्दीबाहेर करोना उपचार घेत असल्यास कोणतेही कारण न देता त्याला रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत.
गेल्या काही दिवसांत हद्दीबाहेर उपचार घेणाऱ्या आणि नंतर मृत्युमुखी पडलेल्या करोना बाधितांना अंत्यविधीसाठी पुन्हा शहरात आणण्यास पालिकेकडून नकार देण्यात येत होता. त्याबाबत तक्रारी वाढल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेतील अनेक नागरिकांनी शहराच्या हद्दीजवळच्या गावांमध्ये आपल्या नातेवाईकांकडे अथवा आपल्या दुसऱ्या घरांमध्ये राहणे पसंत केले. मात्र, या गावांमध्ये बाधित वाढत आहेत. तर काही जण हद्दीजवळील गावांमध्ये उपचार घेत आहेत.
मात्र, यापैकी कोणाचा तेथेच मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह शहरात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. अशा नागरिकांचे नातेवाईक स्थानिक नेत्यांशी संपर्क साधून अंत्यविधी पुण्यातच करायचा असल्याने रुग्णवाहिकेची मागणी करतात. पण, मृत्यू हद्दीबाहेर झाल्याचे कारण देत प्रशासन रुग्णवाहिका तसेच शहरात अंत्यसंस्कार करण्यास नकार देत होते. त्यामुळे अंत्यविधीस दहा-दहा तास उशीर होत होता.