आंबेगाव बुद्रुक- पुणे शहराचा विकास “स्मार्ट सिटी’ अंतर्गत होत असला तरी महापालिकेत समावेश केलेल्या 11 गावांच्या विकास आराखड्यासह निधी उपलब्ध करून देण्याबाबत नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या टर्मला प्रभाग क्र. 42 मध्ये केवळ दोन नगरसेविकांकडे ही गावे सोपविण्यात आली परंतु, समाविष्ट गावांच्या विकासकामांसाठी पालिकेकडून निधीची तरतूदच केली गेली नसल्याचे सांगत विद्यमान या प्रभाग क्र. 42चे नेतृत्त्व करणाऱ्या नगरसेवकांनी हात वर केले. त्यामुळे यावेळी महापालिकेत बाहेरचा नव्हे तर याच भागातील नगरसेवक निवडून जायला हवा, अशी मानसिकता नागरिकांची झाली आहे.
पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेल्या गावांच्या यादीत सर्वात दुर्लक्षित गाव म्हणून आंबेगाव बुद्रुकचा पहिला क्रमांक लागतो. विशेष म्हणजे या गावाचा विकास आराखडाच पालिकेकडे अद्यापही तयार नाही. विद्यमान नगरसेवक या भागाकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे पालिकेत असूनही हा भाग आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे.
आंबेगाव बुद्रुक गावात चढ-उतारांचा मोठा भाग आहे. यामुळे या भागाचे नागरीकरणही त्याच पद्धतीने झालेले आहे. ग्रामपंचायत काळात बांधकामाचे कोणतेही निकष न पाळता दाटीवाटीने आडमाप बांधकामे उभी राहिली आहेत, त्यावेळच्या गरजेनुसार रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाणी वाहिन्या अशी कामे करण्यात आली होती. परंतु, आता नागरीकरण झाल्याने ही यंत्रणा अपुरी पडू लागली आहे.
त्यामुळे या भागाचा सुधारित विकास आराखडा तयार करणे तसेच त्याकामी पालिकेकडून निधी आणणे, कामे करून घेणे याकरीता याच भागातील स्थानिक नगरसेवक असणे गरजेचे आहे, याच मानसिकतेतून आगामी महापालिका निवडणुकीत आंबेगावचा सुधारित विकास तसेच रखडलेली कामे हाच मुद्दा गाजणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या भागाची पाहणी करून नियोजनबद्ध विकास आराखड्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच मतदारांपुढे यावे, अशी प्रतिक्रियाही उमटू लागली आहे.
गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, आमच्या कारकिर्दीत जी कामे झाले तशी कुठलीच कामे पालिकेला करता आलेली नाही. या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गावाबद्दल आस्था असलेली व्यक्तीच पालिकेत नेतृत्व करणारी असावी.
– संतोष ताटे, माजी सरपंच, आंबेगाव बुद्रक
ग्रामपंचायतीच्या कालावधीत आम्ही जी विकासकामे केली तीच अद्यापही सुस्थितीत आहे. त्यानंतर पालिकेच्या निधीतून गावात एकही ठोस विकासकाम झालेले नाही. आगामी काळात याच भागातील नेतृत्व पालिकेत गेल्यास निश्चितच गावाला फायदा होईल.
– अनिल कोंढरे, माजी उपसरपंच, आंबेगाव बुद्रक