सातारा – सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात सदरबझारमधील प्रभाग क्रं. 1 ते 5 मधील 7500 हजार कुटुंबांपैकी 3500 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात पुणे मुंबई येथून आलेल्याची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
साताऱ्यात नागरिकांचे आरोग्य, प्रत्येक कुटुंबाची तपशीलवार माहिती व कुटुंबात पुणे व मुंबई येथून आलेल्या आप्तस्वकियांची माहिती घेण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेने 22 पथके सक्रिय आहेत. सदरबझारचा झोपडपट्टीसदृश्य परिसर मोठा आहे. लक्ष्मी टेकडी परिसरालगत खेड ग्रामपंचायतीची हद्द आहे. येथे पायाभूत सुविधांचा कायमच बोजवारा उडलेला असतो. म्हणूनच सातारा पालिकेने अतिप्रभावित क्षेत्र म्हणून 22 मार्चपासून प्रभाग क्र. 1 ते 5 येथे पाच पथके विशेषत्वाने सक्रिय केली होती. यामध्ये पालिकेचे कर्मचारी, नर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकांनी गेल्या पाच दिवसांत रोज नऊ ते दहा तास काम करून 3500 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण केले.
यामध्ये केवळ पुणे- मुंबई येथून आलेल्यांच्या नोंदणीबरोबरच प्रत्येक कुटुंबप्रमुखासह, सदस्यांचा तपशील त्यांची मेडिकल हिस्ट्री, नजीकच्या काळात झालेला प्रवास, चालू असलेले उपचार त्याचा तपशील आदी नोंदी प्रामुख्याने घेतल्या जात आहेत. मात्र, ही कसरत करताना समन्वय व अचूक नोंदी यांचे मोठे आव्हान पथकासमोर आहे.
पुणे, मुंबई येथून आप्तस्वकियांची गर्दी वाढली आहे. खेड, पिरवाडी, कांगा कॉलनी, जय जवान सोसायटी, विलासपूर ग्रामपंचायत, बेगर्स होम परिसर, शिक्षक कॉलनी, गुलमोहोर कॉलनी, सदरबझार पोलीस चौकी परिसर येथे संचारबंदीने गर्दी जाणवत नसली तरी घरांमध्ये गर्दी वाढली आहे. आरोग्याबाबतचा निष्काळजीपणा व लांब पल्ल्याचा प्रवास यामुळेच करोना संसर्गाचा धोका वाढण्याची तीव्रता अधिक आहे.
पालिकेच्या सूत्रांनुसार शहराच्या पूर्व भागात पाच किलोमीटरच्या परिसरात बाहेरून आलेल्यांची अंदाजे संख्या 1600 च्या आसपास आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा, सातारा जिल्हा रुग्णालय व एएनएचएम यांच्याकडून या भागावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणे गरजेचे बनले आहे. सातारा पालिकेने या सर्व नोंदी जिल्हा प्रशासनाकडे सुुपूर्द केल्या आहेत .
माहिती मिळताना प्रचंड दमछाक
पथक व पालिका आस्थापनांचा समन्वय होताना बऱ्याच अडचणी येत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. समन्वय व सुसूत्रता सांभाळताना आरोग्य पथकाची मोठी दमछाक होत आहे. काही ठिकाणी चांगले सहकार्य तर काही ठिकाणी नागरिकांकडून वेळ नाही, असे सांगून पथकाच्या तोंडावरच दरवाजा बंद केला जात आहे. सदरबझारमध्ये उच्चभ्रू कॉलन्यांमध्ये संसर्गाच्या भीतीने नागरिक दरवाजाच उघडत नसल्याची परिस्थिती आहे. लक्ष्मी टेकडी व सदरबझारच्या मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये “सीएए’ सर्वेक्षणाच्या गैरसमजुतीतून माहितीच दिली जात नसल्याची तक्रार आहे.